पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्यं केलं. आपल्या देशातले शेतकरी हे आत्मनिर्भर भारत या संकल्पेनचा कणा आहेत असं ते म्हणाले. तसेच, देश जर महात्मा गांधींच्या विचारांच्या मार्गावर चालला असता, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच नसती पडली, असं देखील मोदींनी यावेळी बोलून दाखवलं.

मोदी म्हणाले, “२ ऑक्टोबर आपल्या सर्वांसाठी प्रेरक दिवस असतो. हा दिवस महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. गांधीजींचे विचार आणि आदर्श आज पहिल्यापेक्षी कितीतरी अधिक प्रासंगिक आहेत. महात्मा गांधींचे जे आर्थिक विचार होते. तर त्या चेतनेला पकडले गेले असते, समजले गेले असते त्या मार्गावर चालले गेले असते. तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच नसती पडली.”

तसेच, गांधीजींच्या आर्थिक विचारांमध्ये भारताचीच नसं-नस होती. भारताचा सुगंध होता. महात्मा गांधींचे जीवन आपल्याला याची आठवण करून देते की, आपण हे सुनिश्चित करावं की आपलं प्रत्येक कार्य असं असावं ज्यामुळे गरिबातील गरीब व्यक्तीचं भलं व्हावं. तर, शास्त्रीजींचे जीवन आपल्या विनम्रता व साधेपणाचा संदेश देतं. असं देखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

आपल्या देशातले शेतकरी हे आत्मनिर्भर भारत या संकल्पेनचा कणा आहेत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. “असं म्हणतात की जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटांचा सामना अत्यंत प्रभावीपणे करु शकतो. आपल्या देशातले शेतकरी हे याचंच उदाहरण आहेत. देशातल्या शेतकऱ्यांनी करोना काळात पाय जमिनीवर घट्ट रोवून या संकटाला तोंड दिलं आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा कणा आपल्या देशातले शेतकरी आहेत.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.