पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत अशी आमचीही इच्छा आहे. पण जर चर्चेची अपेक्षा करीत असाल तर शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे थांबवा. हल्ले थांबवा आणि मगच सहकार्य मिळण्याची अपेक्षा करा, अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
गेले कही महिने नियमित अंतराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेपलिकडून गोळीबार केला जात आहे. जर सीमावर्ती भागातील परिस्थिती निवळावी अशी इच्छा असेल तर नियंत्रण रेषेवर केले जाणारे हल्ले थाबायला हवेत. असे करणे हेच उभयराष्ट्रांमधील विश्वास निमिर्तीसाठीचे सर्वोत्तम प्रयत्न ठरतील, असा टोलाही जेटली यांनी लगावला.
संरक्षणमंत्री आपल्या पहिल्या जम्मूकाश्मीर दौऱ्यावर आले आहेत. जर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि सातत्याने केले जाणारे घुसखोरीचे प्रयत्न थांबले नाहीत तर पाकिस्तानशी चर्चा करणे अशक्य असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीर राज्यातील संरक्षण व्यवस्थेची जेटली यांनी पहाणी केली. वरिष्ठ लष्करी अधिकारी, राज्याचे राज्यपाल एन.एन.व्होरा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अशांसह संरक्षणमंत्र्यांनी तीन स्वतंत्र बैठका घेतल्या.