दोन महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांचा आणि ९ वर्षांच्या लहान भावाचा खून करून पळालेल्या १५ वर्षीय मुलीला आता हरिद्वारमध्ये अटक करण्यात आली आहे. जबलपूरमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीने वडील आणि भावाच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजरमध्ये ठेवले होते. हा भयंकर गुन्हा करून सदर मुलगी तिच्या प्रियकरासह तीन महिने विविध राज्यात फिरत होती. मुलीचे वडील रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. अल्पवयीन मुलीचे १९ वर्षीय मुकूल सिंह याच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधांना विरोध केल्याच्या रागातून आरोपी मुलीने प्रियकरासह वडील आणि भावाची निर्घृणपणे हत्या केली.

नेमकं प्रकरण काय?

सप्टेंबर २०२३ मध्ये आरोपी मुलगी मुकूल सिंहबरोबर पळाली होती. ज्यामुळे मुकूलला पोक्सो कायद्याखाली अटक करण्यात आली. मुकूल जामिनावर बाहेर आल्यानंतर दोघांनीही मुलीच्या वडिलांना संपविण्याचा घाट घातला. वडिल आणि भावाचा खून केल्यानंतर आरोपी मुलगी आणि मुकूल हे तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरत होते. अखेर मुलीला हरिद्वारमधून अटक करण्यात आली आहे, तर मुकूल अजूनही फरार आहे.

हरिद्वारचे पोलीस अधीक्षक प्रमींद्र डोबल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, स्थानिकांनी सदर मुलीला संशयास्पदरित्या फिरताना पाहिल्यानंतर आम्हाला माहिती दिली, त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. तिची चौकशी केली असता तिने केलेला गुन्हा मान्य केला आणि तिची सर्व माहिती दिली. यानंतर मुलीला जबलपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच आरोपी मुकूलचाही शोध आम्ही सुरू ठेवला आहे.

आरोपी मुलीने आपल्या जबाबात सांगितले की, मुकूलच्या सांगण्यावरून तिने वडील राजकुमार विश्वकर्मा यांना मारण्याचा कट रचला. मात्र वडिलांचा खून करत असताना तिचा लहान भाऊ तनिष्क झोपेतून उठला. त्यामुळे त्यांनी या गुन्ह्याचा पुरावा मागे राहू नये म्हणून त्याचाही निर्घृणपणे खून केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरिद्वार पोलिसांनी सांगितले की, सदर मुलगी आणि मुकूल हे जबलपूरमध्ये एकमेकांच्या शेजारी राहत होते. मुकूलचे वडीलही रेल्वेतच नोकरीला आहेत. गुन्हा केल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या शहरांमध्ये भटकत होते. गोवा, बंगळुरू, मुंबई, उत्तर प्रदेश आणि हरिद्वारला पोहोचण्यापूर्वी पंजाब अशा राज्यात त्यांनी प्रवास केला होता. हरिद्वारमध्ये आल्यानंतर मुकूलने मुलीला एकटे सोडून पळ काढला.