Air India crash compensation update: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच ज्याठिकाणी विमान कोसळले तिथे स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता ३३ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण मृतांचा आकडा २७४ वर पोहोचला आहे. विमानाबाहेरील व्यक्तींचा दुर्घटनेत मृत्यू झाला असला तरी त्यांनाही एक कोटीची मदत दिली जाणार असल्याचे टाटा ग्रुपने जाहीर केले आहे.
टाटा ग्रुपने दिलेल्या निवदेनानुसार, विमानाबाहेरील मृतांच्या कुटुंबियांनाही एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्यांचा वैद्यकीय उपचाराचा खर्चही टाटाकडून उचलला जाणार आहे. जखमींना सर्वतोपरी मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही टाटा ग्रुपकडून सांगण्यात आले आहे.
विमान कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी आणि जखमी झालेल्यांमध्ये मेघानीनगर परिसरातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांचा समावेश असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय बोईंग ड्रीमलायनर अपघातात बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. या इमारतीची बांधकाम करुन देण्याचेही आश्वासन टाटाने दिले आहे.
एकूण २७४ जणांचा मृत्यू
एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. एका प्रवाशाचा जीव वाचू शकला. तसेच विमान कोसळल्यानंतर बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या ३३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आर्थिक भरपाईव्यतिरिक्त नातेवाईकांना नोकरी देण्यासंबंधी काही निर्णय घेतला जाईल का? असाही प्रश्न टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला होता. यावर अधिकारी म्हणाले की, सध्या याबाबत काही निर्णय झालेला नाही. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत असून चौकशी सुरू आहे.
टाटा ग्रुपने जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना विमा कंपन्यांकडून सुमारे १.५ कोटी रुपयांची भरपाई मिळेल. टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, न्यू इंडिया ॲश्युरन्स आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या या एअर इंडियाच्या प्राथमिक विमा कंपन्या आहेत.