१९९३ साली देशाला हादरवून सोडणारी साखळी बॉम्बस्फोटाची घटना मुंबईत घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली आहे. पण या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील अनेक आरोपी फरार झाले होते. तर काहीजणांनी विदेशात जाऊन आश्रय घेतला होता. या प्रकरणी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असून नुकतंच चार आरोपींना अटक केली आहे. संबंधित आरोपी मागील २९ वर्षांपासून फरार होते. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी उर्फ ​​शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडल्यानंतर चारही आरोपी फरार झाले होते. मागली जवळपास दोन दशकाहून अधिक काळापासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. आरोपी अबू बकर हा मोहम्मद आणि मुस्तफा डोसाचा जवळचा सहकारी होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडल्यानंतर तो परदेशात पळून गेला होता.

संबंधित आरोपी काही दिवसांपूर्वी बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबाद येथे आले होते. याबाबतची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपी अबू बकर हा मुंबईतील अब्दुल रेहमान स्ट्रीट परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटक केलेल्या सर्व आरोपींचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. १२ मार्च १९९३ साली मुंबईतील विविध ठिकाणी १२ साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. यामध्ये अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं होतं. अवघ्या सव्वा एक तासात मुंबईत १२ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडले होते.