दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवले आहे. अबकारी कर धोरणासंदर्भात त्यांची चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, चौकशीसाठी गेल्यानंतर केजरीवाल यांना अटक केली जाणार असून भाजपा दिल्लीतील सरकार पाडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा चालू आहेत. सरकार पाडण्यासाठीच भाजपाने हा डाव रचल्याचा आरोप आप नेते करत आहेत. दुसऱ्या बाजूला, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) हजर झाले नाहीत. ईडीने आपल्याला पाठवलेले समन्स ‘संदिग्ध, प्रेरित आणि कायद्याच्या दृष्टीने न टिकणारे’ असल्याचे सांगून ते परत घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, केजरीवाल यांना अटक झालीच तर भविष्यात दिल्लीचे मुख्यमंत्रीपद कोण सांभाळणार, आपचे नेतृत्व कोण करणार? याबाबत आपमध्ये खल सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, अशा आव्हानांसाठी आम आदमी पार्टी सज्ज असल्याचं पक्षाच्या पुढील नियोजनावरून दिसत आहे. कारण, केजरीवाल यांना अटक झालीच तर काय करायचं, याबाबत आप नेत्यांनी एक योजना आखली आहे. मंत्री आतिशी मारलेना यांनी पक्षाच्या योजनेबाबत नुकतीच माहिती दिली आहे. आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांची सोमवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व आमदारांनी केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा आग्रह केला. आमदार म्हणाले, तुम्हाला अटक झाली तरी तुम्ही तुमचं पद सोडू नका.

आमदारांच्या बैठकीनंतर मंत्री आतिशी मारलेना यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी आतिशी म्हणाल्या, अटक झाली तरी अरविंद केजरीवाल हेच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. आम्ही सध्या सामान्य लोकांमध्ये जातोय. त्यांची मतं जाणून घेत आहोत. केजरीवाल यांच्याबरोबर जे काही घडतंय ते चुकीचं आहे, असं लोक आता सांगू लागले आहेत. त्यामुळेच आज सर्व आमदारांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना विनंती केली की तुम्ही तुरुंगात गेलात तरी तुम्हीच मुख्यमंत्रीपदी कायम राहावं. कारण तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे.

हे ही वाचा >> “आम्ही नेहमीच सनातन धर्माचा…”, उदयनिधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री आतिशी म्हणाल्या, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली तर आम्ही न्यायालयाला विनंती करू की, त्यांनी आम्हाला तुरुंगात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची परवानगी द्यावी. केजरीवाल याबाबत आमच्या नगरसेवकांशीदेखील बोलतील, तसेच पंजाबमधील आमदारांचं मतही जाणून घेतील.