Air India Flight Manipur Cabin Crew Member: दोन वर्षांपासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्य जातीय हिंसाचारामुळं भरडून निघालं. कुकी आणि मैतेई या दोन समुहातील हिंसक संघर्षामुळे आजवर शेकडो लोकांचे प्राण गेले. कित्येकांना घर-दार सोडून जावं लागलं. दोन वर्षांपासून सुरू असलेला हा संघर्ष गुरूवारपासून थांबला. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान गुरूवारी कोसळलं आणि यात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या नगांथोई शर्मा कोंगब्रैलाटपम आणि लॅमनुंथिम सिंगसन यांचा मृत्यू झाला. हे दुर्दैवी कारण हिंसाचाराच्या विरामाचं कारण
ठरलं.
गुरुवारी एअर इंडियाच्या अपघाताची बातमी आल्यानंतर कुकी समुदायातून येणाऱ्या लॅमनुंथिम सिंगसन आणि मैतेई समुदायाच्या नगांथोई शर्मा कोंगब्रैलाटपम यांच्यासाठी मणिपूरमध्ये प्रार्थना सुरू झाली. एअर इंडियाच्या एआय-१७१ या विमानात केबिन क्रू म्हणून सेवा देणाऱ्या १० जणांच्या चमूमध्ये या दोघींचाही समावेश होता.
दोघींचाही या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर मणिपूरमधील नागरी संघटना, सामान्य लोक पुढे येऊन श्रद्धांजली व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर दोघींसाठी प्रार्थना केली जात आहे. एकमेकांचे हाडवैरी झालेले समुदाय दोन्ही मुलींना श्रद्धांजली वाहत आहेत.
दिल्लीस्थित मैतेई हेरिटेज सोसायटीच्या प्रवक्त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले, “मणिपूरमधील सर्वांनाच दोघींच्या मृत्यूचे दुःख झाले आहे. दोन वर्षांपासून वांशिक कारणामुळे विभागले गेलेले लोक मतभेद विसरून एकत्र येत शोक व्यक्त करत आहेत. या अपघाताच्या माध्यमातून आकाशातील देवदुताने दोन्ही समुदायांना एकत्र आणले, असे दुर्दैवाने आणि खेदाने म्हणावेसे वाटते. मानवी जीवन किती मौल्यवान आहे आणि त्याचे जतन करण्यासाठी शांतता व सौहार्दपूर्ण समाज असणे किती गरजेचे आहे, याची प्रचिती या अपघाताच्या माध्यमातून येत आहे.”
दोन्ही केबिन क्रूच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ दिल्लीतील कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशनने सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्याची घोषणा केली.
कुकी समुदायातून येणाऱ्या लॅमनुंथिम सिंगसन यांचे कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहे. वांशिक संघर्षामुळे तिचे कुटुंब विस्थापित झाले. लॅमनुंथिम या कुटुंबातील एकमेव कमवित्या व्यक्ती होत्या. तिच्याशिवाय आता कुटुंबाचे भवितव्य अधांतरी आहे. सध्या लॅमनुंथिम सिंगसन कुटुंब भाड्याच्या घरात राहते. कुटुंबियाला मदत करण्याचे आवाहन कुकी समुदायाच्या संघटनांनी केले आहे.

मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि इतर अनेक राजकारण्यांनी दोन्ही केबिन क्रू सदस्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यानिमित्ताने राज्यातील विविध पक्षांचे, संघटनांचे नेतेही एकत्र आले असून बाधित कुटुंबियांप्रती त्यांनी सहसंवेदना व्यक्त केली.