Air India Plane Crash Mayday Call to ATC: अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात आज सकाळी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्यामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. हे विमान निवासी परिसरात कोसळल्यामुळे यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता विमान अपघातामागचं नेमकं कारण काय होतं? याविषयी माहिती घेतली जात आहे. विमानातील ब्लॅक बॉक्समधून यासंदर्भात माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी विमानातून वैमानिकाने शेवटचा पाठवलेला संदेश समोर आला आहे.
MAYDAY… वैमानिकाने पाठवलेला शेवटचा संदेश!
विमान अपघातासारख्या गंभीर दुर्घटनांवेळी वैमानिकाकडून एअर कंट्रोल रूम अर्थात ATC ला मदतीसाठी संदेश पाठवला जातो. एअर इंडियाच्या B787 विमानातूनदेखील अशाच प्रकारचा संदेश एटीसीला पाठवण्यात आला होता. यासंदर्भात DGCA कडून निवेदन जारी करण्यात आलं असून त्यात वैमानिकाने नेमका काय संदेश पाठवला, यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
या निवेदनानुसार, या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून १ वाजून ३९ मिनिटांनी टेकऑफ केलं होतं. विमानतळावरच्या २३ क्रमांकाच्या धावपट्टीवरून या विमानानं टेकऑफ केलं होतं. मात्र, टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळातच विमान मेघानीनगर या निवासी भागात कोसळलं. या विमानातील वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी एटीसीला MAYDAY हा संदेश पाठवला होता. संकटकाळी असा संदेश पाठवला जातो.
विमानात नेमके किती प्रवासी, क्रू मेंबर्स होते?
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, अशी माहिती डीजीसीएच्या निवेदनात देण्यात आली आहे. त्याशिवाय, या विामनात २ वैमानिक व १० केबिन क्रू मेंबर्स होते, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. कॅप्टन सुमीर सभरवाल हे या विमानाचे वैमानिक होते. त्यांना ८ हजार २०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे. त्याशिवाय केबिन क्रूलादेखील ११०० तासांच्या उड्डाणांचा अनुभव आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांचाही समावेश
दरम्यान, एअर इंडियानं दिलेल्या सविस्तर निवेदनामध्ये विमानात नेमके किती प्रवासी होते व त्यात आंतरराष्ट्रीय प्रवासी किती होते याचीही माहिती दिली आहे. त्यानुसार, विमानात १६९ भारतीय प्रवासी होते. त्याशिवाय, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक तर १ कॅनडाचा नागरिक प्रवास करत होते. जखमींना रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल केलं जात असून घटनास्थळी बचावकार्य चालू आहे.
नोट: एअर इंडियाकडून प्रवाशांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. संबंधितांनी १८०० ५६९१ ४४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन एअर इंडियाकडून करण्यात आलं आहे.