नवी दिल्ली : संरक्षणविषयक विविध प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याच्या बाबतीत अमर्याद दिरंगाई होत असल्याचे हवाई दलप्रमुख एअर चिफ मार्शल ए. पी. सिंग यांनी खडसावले. एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे ‘वचन’ दिले गेल्यानंतर ती वेळेत पूर्ण झाल्याचे आपल्या तरी स्मरणात नाही, अशा शब्दांत त्यांनी यंत्रणांचे वाभाडे काढले.

भारतीय उद्योग महासंघातर्फे (सीआयआय) आयोजित व्यापार परिषदेमध्ये बोलताना हवाई दल प्रमुखांनी ‘तेजस लाईट कॉम्बॅट जेट’ मिळण्याबाबत हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून झालेल्या दिरंगाईवर बोट ठेवले. “वेळ न पाळणे ही महत्त्वाची समस्या आहे. एकदा वेळ दिली गेली, की त्यानंतर एकही प्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण होत नाही. या विषयामध्ये आपण लक्ष घातले पाहिजे. एखादे वचन पाळणार नसू, तर ते का दिले जाते?,” असा सवाल सिंग यांनी केला. कधीकधी करार करतानाच आपल्याला खात्री असते, की हे वेळेमध्ये पूर्ण होणारे नाही. मात्र आपण पुढे काय होईल ते बघू असे म्हणून सह्या करतो… अर्थात ही प्रक्रियाच चुकीची आहे, अशा शब्दांत हवाई दल प्रमुखांनी यंत्रणेचे वाभाडे काढले.

‘मेक इन इंडिया’ मोहिमेला अनुसरून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न हवाई दल करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “एकेकाळी भारतीय उद्योग आपल्या गरजा पूर्ण करू शकेल, आपल्याला जे अपेक्षित आहे ते देऊ शकेल याबाबत आम्हाला शंका होत्या. त्यामुळे आम्ही बाहेर शोध घेत होतो. मात्र गेल्या दशकभरात परिस्थिती बदलली. आम्हाला जेव्हा आम्ही विचार करायला लागलो, तेव्हा लक्षात आले की भारतातच अनेक संधी उपलब्ध आहेत,” असे सिंग यांनी स्पष्ट केले. भविष्यात सज्ज राहण्यासाठी आपल्याला आतापासून तयारी करावी लागेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ‘देव आमच्याबरोबर होता’

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रथमच जाहीर भाष्य करतना ही मोहीम म्हणजे राष्ट्रीय विजय असल्याचे हवाई दल प्रमुख म्हणाले. “आमचा मार्ग सत्याचा असल्यामुळेच देवदेखील आमच्याबरोबर होता, असे वाटते. ही मोहीम प्रत्येक पातळीवर अत्यंत व्यावसायिक रितीने हाताळली गेली. सर्व यंत्रणा, सर्व सुरक्षादले एकदिलाने काम करत होती आणि जेव्हा सत्य आपल्याबरोबर असते, तेव्हा सर्वकाही ठीकच होते,” असे सिंग म्हणाले. नौदल प्रमुुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी युद्धाचे स्वरूप बदलत असून नवनवे तंत्रज्ञान वापरले जात असल्याचे अधोरेखित केले.