Air India Plane Crash Ahmedabad : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचं हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी निघालं होतं. मात्र, उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलायनर हे विमान काही वेळातच एका वसतिगृहावर कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ केली जात आहे.

अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनेनंतर आता एका प्रत्यक्षदर्शी युवकाने या घटनेचं धक्कादायक वास्तव सांगितलं आहे. अहमदाबादमधील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळलं. मात्र, वसतिगृहावर न कोसळता हे विमान दुसरीकडे एखाद्या निवासी भागात कोसळलं असतं तर तब्बल १,५०० ते २,००० लोकांचा मृत्यू झाला असता एवढी भीषणता या अपघाताची होती असं धक्कादायक वास्तव एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं आहे.

एअर इंडया विमान अपघाताची घटना पाहणाऱ्या एका स्थानिक प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं की, “जर हे विमान निवासी भागात कोसळलं असतं तर १,५०० ते २,००० लोकांचे प्राण गेले असते. मात्र, त्या विमानाच्या पायलटने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणखी मोठी दुर्घटना टळली असं म्हणता येईल. हा अपघात झाला तेव्हा आम्ही क्रिकेट खेळत होतो. विमान अगदी आमच्या वरतून पुढे गेलं, ते खूप जवळ दिसत होतं, असं या घटनेचे साक्षीदार असलेल्या एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने असंही म्हटलं की, “हे विमान अचानक खाली येताना दिसत होतं. तसेच पुढे जाऊन हे विमान कोसळलं तेव्हा स्फोटाचा मोठा कर्कश आवाज ऐकू आला आणि स्फोटानंतर अवकाशात आगीच्या मोठ्या प्रमाणात ज्वाळा दिसून आल्या. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. आम्ही घटनास्थळी धाव घेतली. हे विमान निवासी वस्तीपासून थोड्या अंतरावर कोसळलं. या घटनेत पायलटने समयसूचकता दाखवली त्यामुळे पायलटला सलाम अन्यथा आणखी मोठी दुर्घटना झाली असती, असं विमान अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं.

विमान वाहतूक मंत्रालयाने काय म्हटलं?

नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा यांनी सांगितलं की, “१२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलेलं एअर इंडियाचं विमान हे ६५० फूट उंचीवर गेलं होतं. मात्र, त्यानंतर ते विमान खाली आलं आणि अगदी एका मिनिटानंतर वैद्यकीय वसतिगृह संकुलात कोसळलं. विमानाच्या पायलटने दुपारी १:३९ वाजता (१२ जून) एटीसीला मेडे कॉल केला होता. एटीसीनुसार जेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अगदी एका मिनिटात रिप्लाय गेला होता पण तरीही प्रतिसाद मिळाला नाही. विमानतळापासून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या मेघानी नगरमध्ये हे विमान कोसळलं. तसेच १२ जून रोजी घडलेल्या अपघातापूर्वी याच विमानाने पॅरिस-दिल्ली-अहमदाबाद सेक्टर उड्डाण कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण केलं होतं”, असं समीर कुमार सिन्हा यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू काय म्हणाले?

“गेल्या दोन दिवसांपासून परिस्थिती अत्यंत कठीण होती. अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल माझ्या तीव्र संवेदना आहेत. या घटनेत ज्यांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत त्यांचं दुःख आणि वेदना मी समजू शकतो. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या निर्देशानुसार एअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्याचं निरीक्षण सुरू आहे. भारतातील ३४ ड्रीमलाइनर्सपैकी आठ विमानांची आधीच तपासणी झाली आहे”, असं मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे.