बंगळुरू : भारतीय लष्कराचे प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) मजबूत संरक्षण कवच आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते सदैव सज्ज आहे, अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी रविवारी दिली. राजधानी दिल्लीबाहेर प्रथमच होत असलेल्या लष्कर दिनाच्या सोहळय़ात ते बोलत होते.

पांडे म्हणाले, की उत्तरेतील सीमा भागात सध्या शांतता आहे. प्रस्थापित संकेत आणि विद्यमान यंत्रणेद्वारे शांतता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली आहेत. पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा संदर्भ देत लष्करप्रमुख म्हणाले, की तेथील नियंत्रण रेषेवर युद्धविराम सुरू आहे. त्याचे उल्लंघन करण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. मात्र, सीमेच्या पलीकडे दहशतवाद्यांना अद्यापही पायाभूत सुविधा पुरवल्या जात आहेत. पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न आमची दक्ष यंत्रणा प्रभावीरित्या कारवाई करून हाणून पाडत आहे. ‘ड्रोन’चा वापर करून जम्मू आणि पंजाबच्या सीमा भागात शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थाची तस्करी करण्याच्या प्रयत्नांकडे लक्ष वेधून लष्करप्रमुख पांडे म्हणाले, की त्यांना प्रतिबंध करणाऱ्या यंत्रणेचा (काउंटर ड्रोन जॅमर) वापर करून ‘ड्रोन’ना निष्प्रभ केले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर सुरक्षा दलांसह समन्वय साधून भारतीय लष्कर हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कटिबद्ध आहे. सद्भावना निर्मिती आणि विकासात्मक प्रकल्प राबवण्यावर आमचा भर आहे. याद्वारे आम्ही स्थानिक जनतेस मुख्य प्रवाहात आणू शकतो. त्याचाच एक भाग म्हणून सक्षम तरुणांना त्यांच्या आवडीच्या व्यवसायातील किंवा क्रीडा क्षेत्रात त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी दिली जात आहे, असेही जनरल पांडे यांनी सांगितले.