भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांनी नुकताच हैदराबादमध्ये लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी २०१३ च्या अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका विधानावरून ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली. “आम्हाला १५ मिनिटे नाही, तर १५ सेकंद लागतील”, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, नवनीत राणांच्या या टीकेला आता असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी तुम्हाला १५ सेकंद नाही, तर १ तास देतो, तुम्ही काय करू शकता सांगा?” असं ते म्हणाले.

हेही वाचा – महायुतीत असूनही अमरावतीत बच्चू कडू भाजपच्या नवनीत राणांच्या विरोधात… ते सतत वादग्रस्‍त का ठरतात?

नेमकं काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?

२०१३ मध्ये असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर टीका करताना, “१५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, मग आम्ही का आहोत, हे तुम्हाला दाखवतो”, असं विधान केलं होतं. याच विधानाच्या हवाला देत नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंवर निशाणा साधला होता. “छोट्या भावाने १५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला करण्यास सांगितले होते. मी आज त्यांना सांगू इच्छिते, छोट्या तुला १५ मिनिटे लागत होती. पण आम्हाला फक्त १५ सेकंद लागणार आहेत. जर १५ सेकंदासाठी पोलिसांना बाजूला केले, तर छोट्या भावाला समजणारही नाही, कुठून आले आणि कुठे गेले.” अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती.

असदुद्दीन ओवैसींचं राणांना प्रत्युत्तर

राणांच्या या टीकेला आता असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “१५ सेकंद नाही, एक तास देतो. तुम्ही काय करू शकता सांगा? तुम्ही जास्तीत जास्त अखलाक किंवा मुख्तार अन्सारीबरोबर जे झालं ते आमच्याबरोबर कराल. तुमच्यात किती माणुसकी शिल्लक आहे, मला बघायचं आहे. तुम्हाला कोण घाबरतं? आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आम्ही तयार आहोत. पंतप्रधान तुमचा, प्रशासन तुमचं, तुम्हाला कोणी अडवलंय? आम्हाला कुठं यायचं ते सांगा..आम्ही येऊ”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “आम्हाला १५ सेकंदच लागतील…”, नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवेसींच्या त्या विधानावरून केली टीका

एमआएमच्या इतर नेत्यांनीही केलं भाष्य

यासंदर्भात बोलताना, “अमरावतीत आपला पराभव होणार, हे नवनीत राणा यांना माहिती असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्या अशाप्रकारे विधानं करत आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. भाजपाकडून तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न होतो आहे”, अशी प्रतिक्रिया एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी दिली. तर खासदार इम्तियाज जलील यांनी राणाच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार देत, “अशा मूर्ख लोकांसाठी आमच्याकडे वेळ नाही”. असे ते म्हणाले.