Asaduddin Owaisi News : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहचला आहे. यादरम्यान दहशतवादाच्या मुद्द्यावर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच ओवेसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान आणि त्याचे मित्रराष्ट्र तुर्की यांना खडेबोल सुनावले आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर पाकिस्तानने या दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्याशी संबंध असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. मात्र भारताने या हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा हात असल्याचे स्पष्ट पुरावे असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानने त्याच्या भूमिवरील किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागातील दहशतवादी तळांवर कोणतीही कारवाई केली नाहीच. उलट भारताने या तळांवर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात आहे. तसेच भारतीय लष्करी तळांवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. या दरम्यान तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानला खडेबोल सुनावणारे ओवेसी यांनी तुर्कीच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी दावा केला आहे की एकीकडे तुर्की त्यांच्या देशात दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करतो आणि दुसरीकडे दहशतवादाचे जागतिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानला पाठिंबा देतो.

“मी सरकारला म्हणालो की तुम्ही ओआयसीला चांगले उत्तर दिले. तु्र्कीला आपण समजावून सांगायचे आहे. तु्र्की हा संपूर्ण जगातील एकमेव असा देश आहे जो आपल्याच देशातील दहशतवादी संघटनांवर, कुर्दिश गटांवर बॉम्ब टाकतो. इराकमध्ये जोपर्यंत त्यांच्या बरोबर करार झाला नव्हता तोपर्यंत तिथेही बॉम्बस्फोट करत होता. आता सिरीयामध्ये देखील बॉम्बस्फोट करतो. त्यामुळे तुर्कीला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे की, जर तुम्ही दहशतवादी संघटनांवर कारवाई करू शकता तर मग भारताबाबत का प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत,” असे ओवेसी म्हणाले आहेत. यासंबंधीचा व्हिडीओ त्यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. जेव्हा तुर्की स्वतः कुर्दिशांवर हल्ले करतो, तर तो भारताबद्दल प्रश्न कसे उपस्थित करू शकतो? असं कॅप्शन ओवेसी यांनी या व्हिडीओला दिले आहे.

एआयएमआयएम प्रमुख ओवैसी यांचे म्हणणे योग्य आहे. कारण डिसेंबरमध्ये तुर्कीचे मंत्री हकान फिदान यांनी नवीन सीरियन प्रशासन कुर्दिश गटांबाबतच्या तु्र्कीच्या चिंता दूर करू शकले नाही तर ते देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल ते करतील असे विधान केले होते.