नवी दिल्ली : ब्रिटनमधील लीसेस्टर येथे भारतीय समुदायातील प्रामुख्याने हिंदूंविरोधात उसळलेल्या हिंसाचाराचा भारताने सोमवारी निषेध केला आहे. भारतीयांविरुद्धच्या हिंसाचाराचे हे प्रकरण ब्रिटिश सरकारकडे उपस्थित करून तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे, असे लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून सांगण्यात आले.  

लीसेस्टर पोलिसांनी सांगितले की, या शहराच्या पूर्व भागात तरुणांच्या दोन गटांत हिंसाचार झाल्यानंतर मोठय़ा संख्येने जमाव रस्त्यावर उतरला. या वेळी हिंदू समुदायाच्या मालमत्तांचे नुकसान करून हिंदूंच्या धार्मिक प्रतीकांची नासधूस करण्यात आली. याचा भारतातर्फे निषेध करण्यात आल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तालयातून देण्यात आली. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो, तसेच सरकारने यावर तातडीने कारवाई केली पाहिजे. येथील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २८ ऑगस्टला झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर येथील परिस्थिती बिघडण्यास सुरुवात झाली. गेल्या २४ तासांत लंडनच्या वायव्येकडील लीसेस्टर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील रस्त्यांवर हिंदू आणि मुस्लीम समुदायांत मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार उसळला आहे.