अयोध्येत बहुप्रतिक्षित राम मंदिराचे उदघाटन २२ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर राजकीय पक्ष उदघाटनाच्या निमंत्रणावरून एकमेकांवर टीका करत आहेत. यादरम्यान आता बाबरी मशिदीचे पक्षकार दिवंगत हाशिम अन्सारी यांचे सुपुत्र इक्बाल अन्सारी यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. “जर मला राम मंदिर उदघाटनाचे निमंत्रण मिळाले, तर मी उदघाटनाला उपस्थित राहिल”, असे विधान त्यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना केले. तसेच अयोध्यामध्ये आता राम मंदिर झाल्यानंतर आगामी काळात हिंदू-मुस्लीम यांच्या संबंधावर काय परिणाम होतील? यावरही त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
तत्पूर्वी ३० डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा अयोध्येचा दौरा करत रेल्वे स्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विविध विकासकामांचे उदघाटन केले होते. त्यावेळी मोदी यांच्या स्वागतासाठी इक्बाल अन्सारी हेदेखील उभे असलेले दिसले. त्यांनी पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टीही केली होती. याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला होता. यावर प्रतिक्रिया देताना अन्सारी म्हणाले की, अयोध्यात जितकेही पाहुणे येतात, त्यांचे आम्ही स्वागत करतो. मोदी तर देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे मोदीजी जेव्हा आले, तेव्हा त्यांच्यावर मीही फुलं उधळली.
त्यानंतर आमच्यासाठी विषय संपला
इक्बाल अन्सारी यांचे वडील हाशिम अन्सारी यांनी १९५२ पासून बाबरी मशिदीची कायदेशीर लढाई लढली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र इक्बाल अन्सारी हे या खटल्याचे पक्षकार होते. राम मंदिराचे आता निर्माण झाल्यानंतर काय वाटत आहे, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, “९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर संपूर्ण देशातील मुस्लीम नागरिकांनी त्याचा सन्मान केला. पूर्ण देशात एक पानही हलले नाही. हिंदू-मुस्लीमांचा बंधूभाव कायम आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय आता संपलेला आहे. राम मंदिर उभे राहिले, याचा आनंद वाटतो. २२ जानेवारीच्या सोहळ्याचे निमंत्रण मला अजून आलेले नाही. पण आले तर मी नक्की जाईन.”
हे वाचा >> कोण होते हाशिम अन्सारी? ज्यांनी १९५२ पासून बाबरी मशिदीचा लढा लढला
राजकारण्यांचे ऐकू नका..
इक्बाल अन्सारी पुढे म्हणाले, “मी समाजसेवक आहे. देशात हिंदू-मुस्लीम, मंदिर-मशीद यावरून वाद व्हायला नको. नेते काहीतरी प्रतिक्रिया देऊन वाद निर्माण करतात, मौलाना फतवा काढतात, पण लोकांनी स्वतः विचार केला पाहीजे. याने देशाचा विकास होणार आहे का? माणूस ज्यासाठी जन्माला आला आहे, तेच त्याने केले पाहीजे. एकमेकांना साहाय्य करायला हवे. विकासासाठी, रोजगारासाठी प्रयत्न केले पाहीजेत. हिंदू-मुस्लीम धर्मीयांमध्ये दरी निर्माण होईल, असे कोणतेही काम आपल्या हातून व्हायला नको, याची काळजी सर्वांनीच घ्यावी.”
आणखी वाचा >> उद्धव ठाकरेंना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण का नाही? मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले…
बाबरीसाठी आता कुणीही आग्रही नाही
“९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, तेव्हाच हा विषय संपला. बाबरी मशीदीसाठी मुस्लीम लोक आग्रही नाहीत. यासाठी देशात कुठेही मागणी होत नाही किंवा कुणी आंदोलन करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने पाच एकर जमीन मशीदीसाठी उपलब्ध करून दिली असून ती सुन्नी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. पण जमीन ज्याठिकाणी आहे, तिथे मशीदीची गरज नाही. मी तर सांगितले की, त्या जमिनीवर शेती करा, जे पिकेल ते दोन्ही धर्मीयांमध्ये वाटून टाका. अयोध्येत याधीही हिंदू-मुस्लीम यांचे ऐक्य होते आणि यापुढेही ते कायम राहिल. मी अयोध्येत राहतो, याचा मला अभिमान वाटतो. मी येथील अनेक मठ-मंदिरात गेलो आहे आणि आता राम मंदिरातही जाईल”, असेही इक्बाल अन्सारी म्हणाले.