काश्मीर, सिरची खाडी आणि सियाचेन या प्रश्नांवर भारताशी मागील दरवाजाने चर्चा सुरू असल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझिझ यांनी येथे सांगितले. तथापि, या प्रश्नांवरील चर्चेतून भारतातील निवडणुकांनंतरच मार्ग निघेल, असेही ते म्हणाले.
भारतासमवेत संबंध सुधारण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. मात्र भारतात निवडणुका होणार असल्याने व्यापक चर्चेला विलंब होत आहे. असे असले तरी व्यापार, ऊर्जा आणि व्हिसा या बाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे, असेही अझिझ यांनी पाकिस्तान नभोवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
भारतात आता निवडणुका होणार असल्याने परस्पर संबंधात बाधा येऊ नये यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता राखणे आणि चर्चा सुरू ठेवणे गरजेचे आहे. काश्मीर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून त्याबरोबरच सिरची खाडी आणि सियाचेन या प्रश्नांवर भारताशी मागील दरवाजाने चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.