Cough Syrup News : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नऊ लहान मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर राजस्थानमध्ये देखील तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या लहान मुलांना दिलेल्या कफ सिरपमुळे दुष्परिणाम झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत.
त्यानंतर आता मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांनी एक मोठा निर्णय घेत ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात घडलेल्या घटनेनंतर कफ सिरपच्या धोक्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या संदर्भात आता विविध ठिकाणी कोल्ड्रिफ कफ सिरपच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे.
मध्य प्रदेश, तामिळनाडू सरकारने काय निर्णय घेतला?
छिंदवाडा जिल्ह्यातील नऊ मुलांच्या मृत्यूशी संबंधित गोळा केलेल्या काही नमुन्यांमध्ये तत्सम घातक रसायनं आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने शनिवारी कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्री आणि वितरणावर तात्पुरती बंदी घातल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच मध्य प्रदेश सरकारने तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांना औषध बनवणाऱ्या औषध कंपनीची चौकशी करण्याची विनंती केली. त्यानंतर तामिळनाडू सरकारनेही अशाच प्रकारची कारवाई केली.
केरळ सरकारने काय निर्णय घेतला?
कफ सिरपमुळे काही लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना घडल्याच्या संशयाच्या पार्श्वभूमीनंतर केरळ सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी शनिवारी सांगितलं की, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अहवालात कफ सिरपबाबत सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर केरळने कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री आणि वितरण स्थगित केलं आहे. औषध नियंत्रण विभागाने खबरदारी म्हणून वितरक आणि संबंधित फार्मसींना विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत असं म्हटलं आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काय घडलं?
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लहान मुलांचे मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर आली असून त्यामागे दूषित औषधं कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः Diethylene Glycol (DEG) किंवा तत्सम घातक रसायनं सिरपमध्ये मिसळली गेली असावीत, असा आरोप आहे. अशा घटकांचा औषधात समावेश झाल्यास त्याचा थेट परिणाम यकृत, मूत्रपिंड आणि स्नायूंवार होतो आणि ते जीवघेणं ठरू शकतं. या घटनांनी औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून बालआरोग्यासाठी कडक धोरणे राबवण्याची गरज अधोरेखित केली आहे.