प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी पश्चिम बंगालचा प्रस्तावित देखावा वगळण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती ममता बॅनर्जी यांनी केली होती. कोणतही कारण किंवा औचित्य न सांगता देखावा वगळण्यात आला, हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे, असं ममता यांनी म्हटलं होतं. पुन्हा एकदा याच विषयावरून ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालबद्दल इतका द्वेष का, असा सवाल केंद्र सरकारला केला होता. तसेच याबद्दल उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष सौमित्र खान यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर यांना 'नौटंकी' म्हणत त्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नावावर राजकारण करत असल्याची टीका केली. "नौटंकी ममता बॅनर्जी प्रत्येक गोष्टीत नाटक करतात. सिंगूरच्या तरुणांसोबतही त्यांनी असेच केले. काल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी संपूर्ण बंगालची नौटंकी केली", असं खान म्हणाले. "२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी बंगालचा देखावा समाविष्ट केला जाणार नाही. कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका तृणमूलच्या सदस्यानेच केली असावी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवल्यानंतर, मोदींचे कार्य किती महान आहे, हे तुमच्या लक्षात येईल," असं खान म्हणाले. "पूर्वी ममता बॅनर्जी स्वतः केंद्रीय मंत्री होत्या, त्यांनी त्या वेळी इतर केंद्रीय मंत्र्यांमध्ये नेताजींचा विषय लोकसभेत का उपस्थित केला नाही," असा सवाल देखील खान यांनी उपस्थित केला.