Prashant Kishor On Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू करत प्रचार सुरू केला आहे. मात्र, यावेळी बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

जर बिहारमध्ये जन सुराज पक्षाचं सरकार आलं तर एका महिन्यांत सात मोठे निर्णय घेणार असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. यामध्ये दारू बंदी हटवण्यासह शेतकरी आणि रोजगारांच्या मुद्यांचा समावेश आहे. याच बरोबर बिहारच्या निवडणुकीत जन सुराज पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पहिल्या एका महिन्यांत केली नाही तर आम्ही एका महिन्यांत राजीनामा देऊ असं मोठं विधान प्रशांत किशोर यांनी ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.

‘…तर एका महिन्यात राजीनामा देऊ’

बिहारमध्ये जर जन सुराज पक्षाचं सरकार आलं तर एका महिन्यांत आम्ही आश्वासन दिलेले सात निर्णय घेतले नाही तर एका महिन्याच्या आत जनसुराज्य पक्षाचं सरकार राजीनामा देईल”, असं मोठं विधान प्रशांत किशोर यांनी मुलाखीत बोलताना केलं आहे.

कोणत्या ७ निर्णयांचं प्रशांत किशोर यांनी आश्वासन दिलं?

-प्रशांत किशोर यांनी म्हटलं की, “जनसुराज्य पक्षाचं सरकार आल्यास बाकीचे सर्व कामे तर होतीलच. पण एका महिन्यांत आम्ही सात मोठे निर्णय घेऊ. त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे बिहारमधील दारू बंदी कायदा हटवण्याचा निर्णय घेऊ.”

-दुसरा निर्णय म्हणजे बिहारमधील ६० वर्षांच्या वरील सर्व व्यक्तींना, दिव्यांगांना आणि विधवा महिलांना २००० हजार रुपये महिन्याला देणार”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

-पहिल्या ७ दिवसांत एक वेगळा विभाग स्थापन करणार आणि जे बिहारमधून रोजगारासाठी बाहेर गेले आहेत, त्या सर्वांना एका वर्षांत बिहारमध्येच रोजगार मिळेल, यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय आम्ही घेणार असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

-तसेच ज्या गावातील सरकारी शाळांची अवस्था खराब आहे, त्या गावातील मुलांना पालकांनी खासगी शाळेत पाठवल्यास त्यांची संपूर्ण फी सरकार देणार असल्याचा निर्णय आम्ही घेऊ असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

-त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू, शेतकऱ्यांना मनरेगाच्या माध्यमातून मजदूर मुक्त केलं जाईल, असंही आश्वासन प्रशांत किशोर यांनी दिलं.

-तसेच जे लोकं बिहारमध्ये रोजगार करू इच्छित आहेत त्या सर्वांना आम्ही कर्ज देऊ आणि त्या कर्जावर फक्त ४ टक्के व्याज घेऊ, कमी व्याजदरात कर्ज देण्याचा हेतू म्हणजे तरुण-तरुणी त्यांचा स्वत:चा व्यवसाय उभा करू शकतील, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं.

-तसेच जे भ्रष्ट लोक आहेत, मग त्यामध्ये नेते किंवा सरकारी अधिकारी असतील, त्यांच्यासाठी आमचं सरकार आल्यानंतर एक विशेष कायदा बनवला जाईल आणि त्यांनी लुटलेला सर्व पैसा जप्त केला जाईल, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.