Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) पक्षाने आज (२२ जानेवारी) मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमध्ये सध्या मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार सत्तेत आहे. मात्र, नितीश कुमार यांनी एन.बिरेन सिंह यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. एन.बिरेन सिंह यांच्या सरकारचा पाठिंबा का काढून घेतला? यासंदर्भातील कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, जनता दल (युनायटेड) पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे एनडीएला धक्का बसण्याची शक्यता आहे.

जनता दल (युनायटेड) पक्षाने मणिपूरमधील भाजपाच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचं पत्र जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष के.एस. बिरेन यांनी मणिपूरचे राज्यपाल एल.गणेशन यांना अधिकृत पत्र सादर केल्याची माहिती समोर आली आहे. मणिपूरमध्ये जनता दल (युनायटेड) पक्षाचे सहा आमदार होते. त्यापैकी पाच आमदार याआधी भाजपामध्ये सामील झाले होते. त्यामुळे मणिपूरममध्ये जेडीयूचा एकच आमदार राहिला होता.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. कॉनराड संगमा यांच्या पक्षाने भाजपाच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं कारण मणिपूर राज्यातील हिंसाचाराचं सांगण्यात आलं होतं. नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर आता जनता दल यूनायटेडनेही मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे.

मणिपूरमधील भाजपा सरकारवर कोसळणार का?

जनता दल (युनायटेड) पक्षाने मणिपूरमधील भाजपाच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काही धोका आहे का? सरकार कोसळणार का? असे अनेक सवाल विचारले जाऊ लागले आहेत. मात्र, जनता दल (युनायटेड) पक्षाने जरी पाठिंबा काढला असला तरी अद्याप मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोणताही धोका नाही. कारण भाजपाकडे पूर्ण बहुमत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनता दल (यु)चा आमदार विरोधी बाकावर बसणार

जनता दल (युनायटेड) पक्षाने मणिपूरमधील भाजपाच्या सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मणिपूरच्या राजकारणात ही मोठी घडामोड माणली जात आहे. कारण २०२२ पासून जेडीयूची भाजपासोबत युती होती. पण आता जेडीयूने सत्ताधारी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. आता विधानसभेत जेडीयूचा एकमेव आमदार आता विरोधी बाकावर बसणार आहे.