मूळच्या बिहारच्या असणाऱ्या तरुणीनं उत्तर प्रदेशात राहणाऱ्या तिच्या शालेय मैत्रिणीला मल्याळम भाषेत लिहिलेलं एक पत्र केरळच्या शालेय पुस्तकात इयत्ता सहावीसाठी धडा म्हणून समाविष्ट करण्यात आलं आहे! केरळ सरकारनं नुकताच हा निर्णय जाहीर केला असून तेव्हापासून या पत्राची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि बिहार ते उत्तर प्रदेश व्हाया केरळ अशी काहीशी बिहारच्या धारक्षा परवीनची ही कहाणी त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या माध्यमातून केरळ सरकारचा ROSHINI हा उपक्रमही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे!

नेमका हा काय प्रकार आहे?

मूळच्या बिहारच्या दरभंगा जिल्ह्याचे असणारे धारक्षा परवीनचे वडील मुहम्मद आमीर हे जवळपास २५ वर्षांपूर्वी केरळच्या कोचीजवळ स्थलांतरित झाले होते. तिथे त्यांना एका जोडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरी लागली होती. त्यानंतर जवळपास १२ वर्षांनी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही तिथेच आणलं. त्यात त्यांची पत्नी रजिया खातून, मुलगी परवीन आणि मुहम्मद समीर व मुहम्मद आदिल ही दोन मुलं असं मोठं कुटुंब होतं.

परवीन लहान असताना केरळच्या एर्नाकुलम येथील शाळेत शिकत होती. तिथे तिच्यासोबत चौथीत असताना तिची मैत्रीण पुष्पाही होती. पुष्पा आता तिच्या मूळगावी उत्तर प्रदेशमध्ये असली, तरी आपल्या मैत्रिणीशी शाळेनंतर आपला संपर्क तुटल्याची खंत परवीनला होती. त्यामुळे परवीननं पुष्पाला २०२२ साली चक्क मल्याळी भाषेत पत्र लिहिलं. हेच पत्र केरळच्या शालेय शिक्षण विभागानं सहावीच्या पुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

परवीननं पत्रात काय लिहिलंय?

शाळेत एका शिक्षिकेनं कशा प्रकारे आपल्याला शिलाई मशीन दिलं आणि त्यातून आपलं आयुष्य बदललं, यासंदर्भात या पत्रात परवीननं उल्लेख केला आहे. सध्या खुद्द परवीन केरळमध्येच स्थायिक झाली असून तिथेच तिला पुढचं आयुष्य काढायचं आहे.

“त्यांनी मला शिलाई मशीन दिलं आणि त्या दिवसापासून मी शिलाईचं काम सुरू केलं. जुने कपडे कापायचे आणि ते शिवून नवीन काहीतरी बनवायचं. दहावीनंतर माझ्या पालकांची इच्छा होती की मी पुढचं शिक्षण घ्यावं. पण मला माझ्या या आवडीमध्ये प्रशिक्षण घ्यायचं होतं आणि त्यातूनच माझ्या वडिलांना घर चालवण्यासाठी मदत करायची होती. त्यामुळे मग मी फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर मी इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी अर्था इग्नूमध्ये पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला”, असं परवीननं पुष्पाला पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोशनी प्रकल्प आणि परवीनचं यश

केरळमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांना व त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, तसेच उपजीविकेच्या प्रशिक्षणासाठी रोशनी उपक्रमांतर्गत मदत केली जाते. परवीनदेखील रोशनी उपक्रमाचीच लाभार्थी आहे. आता तीदेखील या उपक्रमाशी जोडली गेली असून स्थलांतरितांच्या मुलांना एर्नाकुलमच्या शाळांमध्ये शिकवते. “मला केरळमध्येच स्थायिक व्हायचं आहे. इथे टेलरिंग किंवा फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरू करायचा आणि एक घर खरेदी करायचं माझं स्वप्न आहे”, असं परवीन सांगते.