लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात विरोधकांनी एकत्र येत I.N.D.I.A ही आघाडी तयार केली आहे. या आघाडीत २६ पक्षांचा समावेश आहे. या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडते आहे. अशात खासदार अमोल कोल्हे यांनी याच अनुषंगाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी भाजपा आणि आरएसएसला ब्रांड मोदींवर विश्वास उरला नाही का? असा सवाल केला आहे. काय म्हटलं आहे अमोल कोल्हेंनी? "पाटणा आणि बंगळुरुनंतर आता इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडते आहे. मुंबईत त्याचे बॅनरही लागले आहेत. जुडेगा भारत, जितेगा इंडिया अशी टॅगलाईनही त्यावर आहे. विरोधी पक्षाला अब की बार मोदी सरकार सारखी दमदार टॅगलाईन मिळाली आहे. बंगळुरुच्या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीला इंडिया असं नाव देण्यात आलं. हे नाव ठेवलं गेल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा भाजपा असो त्यांना या नावावर टीका कशी करायची याचा ठोस पर्याय मिळालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आघाडीला घमंडिया म्हटलं आहे. तसंच प्रत्येक अक्षरापुढचा डॉट वाचत इंडिया नावाची खिल्लीही उडवली. मात्र हे प्रयत्न करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लक्ष्यभेद होऊ शकलेला नाही. आता मुंबईतल्या बैठकीतून विरोधी पक्षांना अनेक अपेक्षा आहेत. तर भाजपा याची वाट पाहते आहे की या आघाडीत कुठेतरी बिघाडी निर्माण होते का? काही वितुष्ट येतं का? " असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. याच व्हिडीओत अमोल कोल्हेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत अमोल कोल्हेंनी कुठले प्रश्न उपस्थित केले आहेत? इंडियाच्या बैठकीत पंतप्रधान पदाचा चेहरा कोण ते जाहीर केलं जाणार का? भाजपा किंवा एनडीए इंडियाच्या विरोधात काही ठोस अॅक्शन प्लान तयार करतील का? इंडियाच्या बैठकीत दिसणारी विरोधकांची एकजूट ही रस्त्यावरही दिसेल का? शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांचेही पक्ष फुटले आहेत तरीही त्यांना जो पाठिंबा मिळतोय त्यामुळे या दोघांचं महत्त्व इंडियामध्ये वाढलेलं दिसेल? भाजपाला इंडियाची भीती वाटते आहे का? ब्रांड मोदींवर भाजपा आणि आरएसएसचा विश्वास राहिलेला नाही का? नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाचा सर्व समावेशक चेहरा म्हणून समोर आणलं जाईल का? https://twitter.com/kolhe_amol/status/1697090510597521467?t=FU6nfrp6NIek3cTlezbjQw&s=08 असे प्रश्न अमोल कोल्हेंनी उपस्थित केले आहेत. एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी हे नाव खूप वर्षांनी ऐकू येतं आहे ही वस्तुस्थिती आहे. कारण २०१४ नंतर भाजपा आणि मोदी सरकार हेच ऐकू येत होतं. आता २०२४ च्या निवडणुका जवळ आल्यानंतर पुन्हा एकदा एनडीए हे नाव ऐकू येऊ लागलं आहे. २०१९ ला मोदींना स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तर एनडीए गायबच झालं होतं असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे. आपल्या संपूर्ण व्हिडीओत त्यांनी यासह विविध मुद्द्यांचं विश्लेषण केलं आहे.