दिल्लीत पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हर्ष वर्धन हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. येथे बुधवारी झालेल्या पक्षबैठकीत वर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वर्धन यांच्या नावाला विजय गोयल यांचा विरोध होता. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी विजय गोयल उत्सुक होते, मात्र पक्षनेतृत्वाला वर्धन यांच्या नावावर सहमती हवी होती. त्यामुळे बुधवारी पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली येथे बैठक झाली. बैठकीत वर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या हर्ष वर्धन यांनी मागील भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्रिपद भूषवले होते. स्वच्छ चारित्र्य ही त्यांची आणखी एक जमेची बाजू आहे.

अखेर गोयलांची तलवार म्यान
मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी डावलल्याने नाराज असलेले दिल्ली प्रदेशाध्यक्ष विजय गोयल व त्यांच्या समर्थक १३ जिल्हाध्यक्षांनी पक्षाविरोधात उपसलेली बंडखोरीची तलवार पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ’समज’ दिल्याने म्यान केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीदेखील विजय गोयल यांना राज्यसभेवर धाडण्याचे आश्वासन दिल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे.
गोयल यांची समजूत काढण्यात राजनाथ सिंह, मोदी व गडकरी यांना यश आल्याने प्रदेश भाजपने सुटकेचा श्वास टाकगोयल व हर्ष वर्धन हे दोन्ही नेते संघ शरणं असले तरी हर्ष वर्धन यांचा भाजप प्रवेश १९९३ साली झाला आहे, तर विधानसभेचे माजी अध्यक्ष चैत्री गोयल यांचे चिरंजीव विजय गोयल जनसंघ अस्तित्वात असताना राजकारणात सक्रिय आहेत. याच कळीच्या मुद्यावर गोयल मुख्यमंत्रीपदाची आस बाळगून होते. मात्र त्यांच्या ऐवजी पक्षाने हर्ष वर्धन यांच्याच नावाला पसंती दिली. गोयल प्रचारात सहभागी होणार असले तरी  ‘घर घर चलो’ अभियानात सक्रिय न झाल्याबद्दल बोलण्याचे  मात्र त्यांनी टाळले.

हर्ष वर्धन यांची ओळख
*  कान, नाक व घसातज्ज्ञ असलेल्या वर्धन यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत.
*  १९९३ मध्ये त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती
*  १९९८, २००३ व २००८ मध्येही ते विधानसभेवर निवडून गेले होते
*  १९९३ मध्ये आरोग्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी दिल्ली पोलिओमुक्त केली.