वाराणसीपासून ज्ञानवापी मशीदीवरून सुरु झालेला वाद आता देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत पोहचला आहे. दिल्लीतील औरंगजेब मार्गावर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बाबा विश्वनाथ मार्ग असे पोस्टर चिटकले आहेत. देशभरात औरंगजेबबद्दल चर्चा सुरू असताना दिल्लीत हा प्रकार घडला आहे. “औरंगजेब हा देशावरचा काळा डाग” असल्याचे वक्तव्य दिल्ली भा

जपा युवा मोर्चाचे अध्यक्ष वासू रखड यांनी केले आहे.

औरंगजेबचे नाव कुठेही नको
वासू रुखड म्हणाले, “औरंगजेबासारख्या आक्रमणकर्त्याने आमच्या देवांचे मंदिर तोडले. बाबा विश्वनाथाचे मंदिर पाडले. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत एक शिवलिंग होते. आज आम्ही औरंगजेब लेनचे बाबा विश्वनाथ मार्ग असे नाव देण्याची मागणी घेऊन आलो आहोत. दिल्ली सरकारने या रस्त्याला बाबा विश्वनाथ मार्ग असे नाव द्यावे, अशी आमची इच्छा आहे. मुघल आक्रमकांनी आमच्या देवांचे मंदिर तोडले हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यांचा इतिहास आम्हाला संपवायचा आहे. हे नाव इतिहासाच्या कोणत्याही पानावर, कोणत्याही रसत्यावर लिहावे, असे आम्हाला वाटत नसल्याचेही रुखड म्हणाले.

ज्ञानवापी मशिदीचा अहवाल सादर

दुसरीकडे ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद-श्रृंगारगौरी संकुलाच्या सर्वेक्षणासाठी न्यायालयाने नेमलेल्या आयोगाने गुरुवारी त्याचा अहवाल सादर केला. अहवालासोबत कागदपत्रे, दृश्यफिती आणि छायाचित्रे जोडण्यात आली आहे.

तळघराच्या एका भिंतीवर ‘त्रिशूल’

तळघराच्या एका खांबावर प्राचीन हिंदी भाषेतील कोरीवकाम सापडले. तळघराच्या एका भिंतीवर ‘त्रिशूल’ चिन्ह सापडले आहे. मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीपासून दोन मोठे खांब आणि एक कमान बाहेर पडते. याचिकाकर्त्यांनी त्यांना मशिदीचे अवशेष म्हटले आहे. तर मशीद समितीने विरोध केला आहे. मशिदीच्या मध्यवर्ती घुमटाखाली शंकूच्या आकाराची रचना सापडली. मशिदीच्या तिसऱ्या घुमटाच्या तळाशी असलेल्या दगडावर कमळ कोरलेले आहे. वुजूसाठी वापरल्या जाणार्‍या तलावात २.५ फूट उंच गोल रचना दिसते. याचिकाकर्त्यांनी त्याला शिवलिंग म्हटले, तर त्याच मस्जिद समितीने ते कारंजे असल्याचे सांगितले आहे.

कोर्टात अहवाल सादर झाल्यानंतर काही काळतच झाला लीक

सीलबंद असलेला हा अहवाल कोर्टात सादर करण्यात आल्यानंतर काही काळातच तो लीक झाल्याची घटना घडली. सर्वेक्षण अहवाल लीक झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. ट्रायल कोर्टात अहवाल सादर न करता हा अहवाल मीडियामध्ये कसा गेला, असा प्रश्न एमआयएम’ पक्षाचे प्रमुख असादुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

मुस्लिम धर्मगुरुंचे शांतता राखण्याचे आवाहन

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारच्या नमाजसंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी मुस्लिम धर्मगुरू मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी मुस्लिमांनी कोणत्याही प्रकारे आंदोलन करू नये, असे आवाहन केले आहे. आपल्या देशाच्या कायद्यावर आपला पूर्ण विश्वास असायला हवा, असे ते म्हणाले.