बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने ‘गलवान’चा उल्लेख करत केलेल्या ट्वीटमुळे वाद निर्माण झाला आहे. रिचाने भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा दावा करत अनेकांनी संताप व्यक्त केल्यानंतर वाद चिघळला होता. रिचाने भारतीय लष्करातील उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना हे विधान केलं होतं. दरम्यान वाद वाढू लागल्यानंतर रिचाने जाहीर माफी मागितली असून कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

“माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या शब्दांमुळे अनावधानाने जरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते,” असं रिचा चड्ढा म्हणाली आहे.

नेमका वाद काय?

ट्विटरवरुन रिचाने एक रिप्लाय देताना ‘गलवान’ असा उल्लेख केल्याने भारतीय लष्कराचा अपमान करण्यात आल्याची टीका होत होती. भारतीय लष्करातील उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना रिचाने हे ट्वीट केलं होतं. भारत सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे, असं द्विवेदी म्हणाले होते. याच प्रतिक्रियेसंदर्भातील ट्वीट रिचाने रिट्वीट करत, “गलवान सेज हाय” म्हणजेच गलवान तुमच्याकडे पाहतंय अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली होती.

अभिनेत्री रिचा चड्ढाच्या पोस्टमुळे नवा वाद! शहीदांचा अपमान केल्याचा होतोय आरोप; गलवानचा उल्लेख करत म्हणाली…

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी, “पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्याबाबतचा प्रस्ताव संसदेत पाठवला आहे,” असा उल्लेख करत पाकिस्तानव्याप्त काश्मीरबद्दल विधान केलं होतं. “हा संसदेतील प्रस्ताव एक भाग झाला, आता उरला प्रश्न भारतीय सैन्यांचा तर भारत सरकारने दिलेला कोणताही आदेश अंमलात आणण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. जेव्हा याबाबतचा आदेश दिला जाईल, तेव्हा आम्ही पूर्ण तयारीने पुढे जाऊ,” असं विधान उपेंद्र द्विवेदी यांनी केलं होतं.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि त्यांच्या विधानाचा फोटो रिट्वीट करत रिचाने, “गलवान सेज हाय” असं म्हटलं होतं. या ट्वीटवरुन बराच वाद निर्माण झाला. अनेकांनी या ट्वीटवरुन रिचाला फटकारलं होतं. तसंच माफी मागण्याची मागणी केली होती. यामध्ये अनेक भाजपा नेत्यांचाही सहभाग होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. मागील ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारत आणि चीनच्या लष्करामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.