खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणात कॅनडानं भारतावर गंभीर आरोप केले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेत या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. या मुद्द्यावरून सध्या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. तर आपापल्या नागरिकांना दुसऱ्या देशात जाताना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व प्रकरणाबाबत जस्टिन ट्रुडो यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. “कॅनडाच्या संसदेत भारतावर या प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांबाबत माहिती देण्याचा निर्णय सहजासहजी घेण्यात आलेला नाही”, असं ते म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून कॅनडातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये त्यांच्या सरकारने यासंदर्भात जवळपास महिन्याभरापासून अनेक पुरावे गोळा केल्याचे दावे करण्यात आले आहेत.

कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

“आम्हाला भारताबरोबर यापुढेही काम करायचंय, पण…”

“भारताचं महत्त्व वाढत आहे यात शंकाच नाही. शिवाय, आम्हालाही भारताबरोबर यापुढेही काम करायचं आहे यातही काहीच शंका नाही. पण आम्ही कोणत्याही प्रकारे भारताला भडकवण्याचा किंवा समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. पण कायद्याचं महत्त्व आणि कॅनडाच्या नागरिकांची सुरक्षा याला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच आम्ही भारत सरकारला या प्रकरणी सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्याबरोबर काम करण्याची विनंती केली आहे”, असं जस्टिन ट्रुडो म्हणाले.

“आम्ही कायद्याला महत्त्व देणारं राष्ट्र आहोत. कॅनडाच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जे जे शक्य आहे, ते आम्ही करत राहणार”, असंही ट्रुडो यांनी नमूद केलं.

Indians in Canada: भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा थांबवली; हरदीप निज्जर हत्या प्रकरणातील आरोपांनंतर मोठा निर्णय!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

जून महिन्यात कॅनडाच्या व्हँकोव्हर भागात खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. जस्टिन ट्रुडो यांनी तीन दिवसांपूर्वी या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप थेट देशाच्या संसदेत केला. यावरून दोन्ही देशांमधले संबंध बिघडले. नुकतीच भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांनी कॅनडाला पाठिंबा दिला आहे.