India-Canada Row: भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. १९ ऑक्टोबर पर्यंत भारतात परतण्याचे आदेश दिल्यानंतर आता कॅनडाचा जळफळाट पाहायला मिळत आहे. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांच्यावर कॅनडाने केलेल्या आरोपानंतर भारताने याची गंभीर दखल घेत उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत मायदेशी बोलावले. यानंतर कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (RCMP) पत्रकार परिषद घेऊन भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगबरोबर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. बिश्नोई गँगसह मिळून कॅनडाच्या भूमीवर दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.

ओटावा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅनडा पोलिसांच्या उपायुक्त ब्रिजिट गौबिन म्हणाल्या, “कॅनडामध्ये संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर आपण पाहत आहोत. यामागे एका संघटित गुन्हेगारी टोळीचा हात आहे. विशेष करून बिश्नोई गँग जी भारतीय गुप्तहेरांशी जोडलेली आहे.” यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना विचारले गेले की, भारत सरकारचे गुप्तहेर हत्या, खंडणी, धमकावणे आणि बळजबरी करण्यासारख्या कामात गुंतले आहेत का? यावर उपायुक्त ब्रिजिट गौबिन यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.

हे वाचा >> India vs Canada : कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश; कॅनडा व्होट बँक पॉलिटिक्स करत असल्याचा आरोप

मुळचा पंजाबचा असलेला ३१ वर्षीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या अहमदाबादच्या साबरमती कारागृहात आहे. मुंबईमध्ये शनिवारी (१२ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. योगायोग बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कॅनडाने बिश्नोई टोळीचे नाव घेतले, या योगायोगाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान जस्टिन ट्रुडोचेही आरोप

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. भारताने राजनैतिक अधिकारी माघारी बोलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रुडो यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कॅनाडाचा पंतप्रधान या नात्याने देशातील सर्वांची सुरक्षा माझे प्रथम कर्तव्य आहे. आमच्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला जी पावले उचलावी लागतील ती उचलू.