CBSE 10 th Class Board Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) आता दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून दोन वेळा बोर्ड परीक्षा होणार आहे. या संदर्भातील निर्णय आज (२५ जून) सीबीएसई घेतला आहे. त्यामुळे २०२६ पासून दहावीचे विद्यार्थी वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देऊ शकणार आहेत.
दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये होणारा हा बदल २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे. या नव्या निर्णयानुसार २०२६ पासून विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षेला बसता येणार आहे. या निर्णयामागचा उद्देश हा विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी संधी मिळावी, हा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.
सीबीएसईच्या नव्या निर्णयानुसार आता प्रत्येक विद्यार्थ्याने फेब्रुवारीत होणारी परीक्षा देणं अनिवार्य आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण आणखी सुधारायचे असतील त्या विद्यार्थ्यांनी मे महिन्यांत होणाऱ्या दुसरी परीक्षा देणं गरजेचं असणार आहे. पण एका वर्षांत दोन परीक्षा घेण्यात येणार असल्या तरी विद्यार्थ्यांचं वर्षातून एकदाच मूल्यांकन होणार आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
तसेच सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयाची आता लगेच अंमलबजावणी होणार नाही, तर हा निर्णय २०२६ पासून लागू केला जाणार आहे. पण या निर्णयाबाबतही सीबीएसई आणखी काही नियम तयार करणार असून त्या नियमांवर पुन्हा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून सूचना मागवल्या जातील. त्यानंतर त्या सूचना लक्षात घेऊन पुढील अंमलबजावणी कशी करायची? याचा निर्णय घेतला जाणार आहे.
सीबीएसईच्या निर्णयातील प्रमुख मुद्दे कोणते?
-२०२६ पासून सीबीएसई इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेणार आहे. या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मे मध्ये पार पडेल. मात्र, पहिली परीक्षा अनिवार्य असेल तर दुसरी ऐच्छिक असेल.
-पहिल्या टप्प्यातील निकाल एप्रिलमध्ये जाहीर केले जातील, तर दुसऱ्या टप्प्याचे निकाल जूनमध्ये जाहीर केले जातील. या निर्णामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळेल. तसेच या शैक्षणिक वर्षात अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदा होईल जे दोन्ही परीक्षा टप्प्यांसाठी लागू असेल.