महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात राज यांनी उघडपणे भूमिका घेतल्यानंतर त्यांना मागील काही दिवसांपासून धमकावलं जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवली जाणार असल्याचा दावा केला जातोय. ‘एबीपी न्यूज’च्या सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार राज यांना पीएफआय या संघटनेकडून धकमावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

राज ठाकरे हे एक मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय. तसेच राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर राज यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर येतेय. मात्र या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही.

नक्की वाचा >> “राज ठाकरे भाजपाचा अनधिकृत भोंगा”; औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

१२ तारखेच्या ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. ईदपर्यंत म्हणजेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात आले नाही तर आम्ही मशिदींसमोर भोंग्यावर तितक्याच आवाजामध्ये हनुमान चालीसा लावू असा इशारा राज यांनी दिलाय. भोंग्याचा विषय हा सामाजिक असून आपण भोंग्यांविरोधातील भूमिकेवरुन मागे हटणार नाही असंही राज यांनी स्पष्ट केलंय. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार राज यांनी महाराष्ट्रातील सरकारला काय करायचेय ते करावे आम्ही भोंग्यांविरोधातील भूमिका कायम ठेवणार असल्याचं म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे आता औरंगाबादमध्येही सभा घेणार असल्याने भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.