Champions Trophy India Vs Pakistan Match : चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy)साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला न पाठवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे पडसाद आता राजकीय वर्तुळातदेखील उमटताना दिसत आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारला खेळापासून राजकारण दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला जाऊ शकत असतील तर भारतीय संघ अनेक देश सहभागी होत असलेल्या पाकिस्तानातील स्पर्धेत का खेळू शकत नाही? असा सवालही तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी २०१५ मध्ये पाकिस्तानमधील लाहोरला गेले होते. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी गेले होते. याचा संदर्भ देत तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

तेजस्वी यादव म्हणाले की, “खेळात राजकारण नसावे. त्यांनी (पाकिस्तान) आपल्या देशात यावे आणि आपल्या खेळाडूंनीही तिकडे जावे. खेळात काय अडचण आहे? खेळात युद्ध होतं असं तर काही नाही. भारताने का जाऊ नये? जर पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात जाऊ शकतात आणि तर ती चांगली गोष्ट मानली जाते, पण जर भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला गेला तर हे वाईट अर्थाने पाहिले जाते. ही विचार करण्याची योग्य पद्धत नाही”, असेही तेजस्वी यादव म्हणाले.

भारताने राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. यामुळे या स्पर्धेचे भविष्य काही असेल याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. भारताने या स्पर्धेतील सामन्यांसाठी ‘हायब्रीड मॉडेल’ अवलंबण्याचा प्रस्ताव दिला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचे सामने यूएई किंवा श्रीलंका अशा तटस्थ ठिकाणी खेळवले जावेत अशी मागणी केली आहे. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आयसीसीने शुक्रवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

हेही वाचा>> Sambhal Jama Mosque : “कनिष्ठ न्यायालयाने कोणतीही कारवाई करू नये”, संभल जामा मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

यादरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार किर्ती आझाद यांनी मात्र दहशतवाद आणि संवाद एकत्र केले होऊ शकत नाही असे म्हटले आहे. “आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार नाही… ते दहशतवादी पाठवत राहतील आणि आम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणार नाहीत” असे आझाद यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान भारतीय क्रिकेट संघ यापूर्वी २००८ मध्ये अशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तान दौर्‍यावर गेला होता. भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये २०१२-१३ मध्ये मालिका भारतात खेळवण्यात आली होती. मात्र दोन्ही देशांमधील राजकीय संबंध बिघडल्याने दोन्ही देश फक्त आता आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरोधात खेळत आहेत.