पक्षांतरावर ‘वायएसआर’ काँग्रेसची टीका
तेलुगु देसमच्या राज्यसभेतील चार सदस्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ही घटना अनैतिक व लोकशाहीविरोधी आहे असा आरोप तेलुगु देसमने केला आहे. तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकू नये यासाठी चंद्राबाबूंनीच या खासदारांना भाजपमध्ये पाठविले अशी टीका वायएसआर काँग्रेसने केली आहे.
तेलुगु देसमची बैठक चंद्राबाबूंच्या निवासस्थानी के. कला वेंकट राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चंद्राबाबू सध्या सुट्टीवर युरोपमध्ये आहेत. भाजपमध्ये चार खासदारांचे विलीनीकरण लोकशाहीविरोधी आहे असे मत आंध्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते येनमला रामकृष्ण नायडू यांनी व्यक्त केले. राज्यसभेत बहुमत मिळवण्यासाठी भाजप अशा मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्राबाबूंना अडचणीत आणण्यासाठी हे प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.
भाजपमध्ये जे चार खासदार सामील झाले आहेत त्यातील तिघे जण चंद्राबाबूंसाठी बेनामी म्हणून काम करतात असा आरोप वायएसआर काँग्रसेचे संसदीय पक्षनेते व्ही. विजयसाई रेड्डी यांनी केला आहे. ही निकाल-निश्चिती आहे, असा आरोप त्यांनी केला. चंद्राबाबू सुट्टीवर कोठे गेले आहेत हेदेखील पक्षनेत्यांना माहीत नाही याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.स्वीत्र्झलड की स्वीडनला गेलेत हे त्यांनी गोपनीय ठेवले काय? असा सवाल रेड्डी यांनी विचारला.