काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व परत मिळाल्यानंतर बुधवारी सभागृहात पहिलं भाषण केलं. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. “सत्ताधाऱ्यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली”, अशा शब्दांत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. यावरून नंतर सत्ताधारी बाकांवरून स्मृती इराणी, अनुप्रिया पटेल यांनीही प्रत्युत्तर दिलं. मात्र, नरेंद्र मोदींविरोधातील अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींनी केलेल्या भाषणादरम्यान टीव्ही स्क्रीनवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाच जास्त वेळ दिसत होते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर काँग्रेसकडून नेत्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. यासंदर्भात विरोधकांकडून आज वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचं भाषण झालं. आपल्या भाषणात राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “यांच्या राजकारणानं मणिपूरला नाही, हिंदुस्थानला मणिपूरमध्ये मारलं आहे. यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
संसद टीव्हीवर लोकसभेतील कामकाजाचं थेट प्रक्षेपण केलं जातं. मात्र, राहुल गांधींचं भाषण चालू असताना बहुतांश वेळ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाच स्क्रीनवर दिसत होते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यासाठी पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी आकडेवारीनिशी दावा केला आहे.
जयराम रमेश यांचं ट्वीट
जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांच्या भाषणासंदर्भातली आकडेवारी ट्वीटमध्ये लिहिली आहे. राहुल गांधींच्या भाषणादरम्यान ७१ टक्के वेळ कॅमेरा ओम बिर्ला यांच्यावरच होता, असा दावा त्यांनी केला आहे.
Monsoon Session: “जर गांधी खानदानात हिंमत असेल, तर…”, स्मृती इराणींचं राहुल गांधींवर टीकास्र
“अन्यायकारक अपात्रतेनंतर परत आल्यावर राहुल गांधींनी आपल्या पहिल्या भाषणात १२.०९ ते १२.४६ असे एकूण ३७ मिनिटं अविश्वास प्रस्तावावर बोलले. यात संसद टीव्हीनं त्यांना फक्त १४.३७ मिनीट स्क्रीनवर दाखवलं. ते एकूण जेवढा वेळ बोलले, त्यापैकी हा कालावधी अवघा ४० टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेमकी कशाची भीती वाटतेय?” असा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.
“हे पुढे याहून वाईट होतं”
दरम्यान, पुढच्याच ट्वीटमध्ये जयराम रमेश यांनी आणखी एक आकडेवारी दिली आहे. “हे पुढे अजून वाईट होतं. राहुल गांधी मणिपूरच्या मुद्द्यावर १५.४२ मिनिटं बोलले. यापैखी ११ मिनीट ८ सेकंद एवढ्या कालावधीसाठी संसद टीव्हीचा कॅमेरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरच होता. हे प्रमाण जवळपास ७१ टक्के इतकं आहे. राहुल गांधी मणिपूरवर बोलले, त्यापैकी फक्त ४ मिनीट ३४ सेकंद त्यांना स्क्रीनवर दाखवण्यात आलं”, असं जयराम रमेश यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणी यांनी याआधी काँग्रेसच्या सत्ताकाळात घडलेल्या काही घटनांचा दाखला देत विरोधकांवर टीका केली. तसेच, सत्ताधारी पक्षाच्या इतर काही खासदारांची भाषणं झाल्यानंतर संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही बाजू मांडली.