पीटीआय, वॉशिंग्टन
भारताच्या पाकिस्तानसोबतच्या अलीकडील संघर्षात चीन हा पूर्णपणे दुर्लक्षित करता न येणारा घटक आहे, असे काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले. भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये अलीकडेच काही प्रमाणात सुधारणा होत असताना ही परिस्थिती उद्भवली, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या बहुपक्षीय भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करत असलेले थरूर भारतीय दूतावासात आयोजित ‘थिंक टँक’ प्रतिनिधींसोबतच्या संवादात बोलत होते.

चीनचे पाकिस्तानमधील मोठे हितसंबंध आहेत, असे शशी थरूर यावेळी म्हणाले. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपेक) हा ‘बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’अंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प आहे. शिवाय, पाकिस्तानच्या संरक्षण साहित्यातील ८१ टक्के साहित्य चीनकडून पुरवले जाते. भारत-पाकिस्तान संघर्षात चीन हा पूर्णपणे दुर्लक्षित करता न येणारा घटक आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत-चीन संबंध तणावपूर्ण राहिले असले तरी, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यास सुरुवात झाली होती. पण या संघर्षानंतर चीनने पाकिस्तानला दिलेले प्रत्यक्ष समर्थन, अगदी सुरक्षा परिषदेतही, वेगळ्या प्रकारचे होते, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला आमच्या शेजारील आव्हानांची पूर्ण जाणीव आहे. पण भारताने नेहमीच संवादाचे दरवाजे उघडे ठेवले आहेत, अगदी शत्रूंशीही, असे ते म्हणाले. आम्ही विकास, व्यापार, प्रगती यावर भर दिला आहे. चीनबरोबर व्यापार आजही विक्रमी पातळीवर आहे. त्यामुळे भारत कोणतीही शत्रुत्वाची भूमिका घेत नाही. पण या पार्श्वभूमीतील इतर प्रवाहांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे थरूर म्हणाले.