पीटीआय, नवी दिल्ली २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाला उपस्थित न राहण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निवडणुका डोळय़ासमोर ठेवून सोहळय़ाला राजकीय स्वरूप दिले असल्याने आदरपूर्वक निमंत्रणाला नकार देत असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षाचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी स्पष्ट केले. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ‘धर्म ही वैयक्तिक बाब आहे. मात्र संघ, भाजपने दीर्घकाळापासून अयोध्येतील मंदिराचे रूपांतर राजकीय प्रकल्पात केले आहे. फक्त राजकीय लाभासाठी भाजप आणि संघाच्या नेत्यांकडून अपूर्ण मंदिराचे उद्घाटन केले जात आहे. २०१९च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करत आणि श्रीरामाच्या लाखो भाविकांचा आदर ठेवून खरगे, सोनिया गांधी आणि चौधरी यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. हेही वाचा >>>अयोध्येतील राम मंदिरासाठी देश, विदेशातून विशेष भेटवस्तू ‘रावणाप्रमाणे त्यांची मती भ्रष्ट’ त्रेतायुगामध्ये रावणाची मती भ्रष्ट झाली होती. त्याचप्रमाणे काँग्रेसची झाली आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते नलीन कोहली यांनी केली. त्यांचा हा निर्णय आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही, कारण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी अयोध्येत मंदिरासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, असे कोहली म्हणाले. काँग्रेसला या प्रश्नावर लवकर सुनावणीही व्हायला नको होती असा आरोप त्यांनी केला.