गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रायबरेली येथून कॉंग्रेसच्या आमदार अदिती सिंह यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती. अदिती सिंह आणि राहुल गांधी यांच्या काही छायाचित्रांद्वारे दोघांचं लवकरच लग्न होणार, असा दावा काहीजण करत होते. अदिती यांना लग्नासाठी राहुल गांधींनी मागणी घातल्याचीही सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र, या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत असं अदिती सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

‘मी राहुल गांधींना राखी बांधते. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जी अफवा पसरवली जातेय, त्यामुळे मी केवळ हैराण नाही तर दुःखीही झाले. राहुल गांधी माझ्या पक्षाचे केवळ अध्यक्ष नाही तर ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. माझ्या मनात त्यांच्यासाठी खूप आदर आहे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की, लग्नाबाबतच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं अदिती म्हणाल्या.

अफवा पसरवण्यामागे राजकीय षडयंत्र असू शकतं अशी शंका अदिती यांनी व्यक्त केली. कर्नाटक निवडणुकांमध्ये फायदा व्हावा म्हणून मुद्दाम आमच्या लग्नाबाबत बातम्या पसरवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसंच , काही लोक राजकारणात मला कमकुवत करू इच्छितात, कदाचित त्यांनी ही अफवा पसरवली असू शकते. पण मी अशा कोणत्याही गोष्टीमुळे घाबरणार नाही, असं अदिती म्हणाल्या.