आसाममध्ये बांगलादेशातून होणारी घुसखोरी थांबविण्यात काँग्रेसला यश आलेले नाही आणि बेकायदेशीरपण स्थलांतर केलेल्यांचा काँग्रेस पक्ष व्होट बँक म्हणून वापर करीत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केला.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे आसाममध्ये प्रचाराला येणार आहेत, बांगलादेशमधून येणाऱ्या घुसखोरांना आम्ही थांबवू असे सोनिया गांधी यांनी जाहीर करावे, मात्र त्या असे जाहीर करणार नाहीत कारण बांगलादेशातील घुसखोरांचा काँग्रेस व्होट बँक म्हणून वापर करीत आहे, असे शहा म्हणाले.
आसाममध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले की घुसखोरीचा प्रश्न संपुष्टात येईल, आम्ही बांगलादेशची सीमा बंद करू, त्यामुळे कोणत्याही घुसखोराला येथे पाऊल ठेवणे शक्य होणार नाही, असे शहा म्हणाले. बांगलादेशातून होणारी घुसखोरी हा केवळ आसामचा प्रश्न नाही तर संपूर्ण देशाचा प्रश्न आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्य आणि फाळणीच्या वेळी काँग्रेसने आसामला कोठे नेऊन ठेवले होते, पं. जवाहरलाल नेहरू यांनी आसामला ‘ड’ वर्गवारीच्या राज्याचा दर्जा दिला असे शहा म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress unable to stop bangladesh infiltration in assam says amit shah
First published on: 29-03-2016 at 02:07 IST