सुरक्षा आयुक्तांमार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरू, पंतप्रधान मोदींची अपघातस्थळी भेट

पीटीआय, बालासोर

ओदिशातील भीषण तिहेरी रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा शनिवारी २८८ वर पोहोचला, तर जखमींची संख्या ९०० हून अधिक झाली. या दुर्घटनेला २४ तास उलटल्यानंतरही ती कशी घडली आणि का घडली, हे अद्याप अस्पष्ट असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दोषींना कठोर शिक्षा करण्याची ग्वाही दिली.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

अपघाताचे नेमके कारण चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी सिग्नल यंत्रणेतील त्रुटीमुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचा अधिकृत दुजोरा नसलेला प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची उच्चस्तरीय चौकशी रेल्वेच्या दक्षिण-पूर्व मंडळाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. एम. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली असल्याचे रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. दोन्ही एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी होते, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

रेल्वेने तुरळक तपशिलांसह अपघाताचे एक रेखाचित्र जारी केले आहे. त्यानुसार कोरोमंडल एक्स्प्रेस बहनगा स्थानकाजवळ आली तेव्हा अप मार्गिकेला समांतर लूप लाइनवर मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गिकेवरून पुढे जाणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. कोरोमंडल एक्स्प्रेस अप मुख्य मार्गिका सोडून लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला मागच्या बाजूने धडकली. मालगाडीवर कोरोमंडलचे इंजिन चढल्याचे दृश्य दुर्घटनास्थळी होते. सिग्नल यंत्रणेतील त्रुटींमुळे अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी चौकशीनंतर तपशील कळू शकतील, असे रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले.

एक दुर्घटनाग्रस्त डबा जमिनीत रुतला आहे. त्याला काढण्यासाठी शनिवारी क्रेन आणि बुलडोझरचा वापर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा डबा बाहेर काढल्यानंतर मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.जखमी प्रवाशांना अपघातस्थळावरून रुग्णालयात नेण्याचे काम पूर्ण झाले आहे. जमिनीत रुतलेला प्रवासी डबा काढण्याचेच काम बाकी आहे. अपघातस्थळावरील ढिगारा हटवल्यानंतर रेल्वे रुळ पूर्ववत करणे आदी कामे केली जातील, अशी माहिती दक्षिण पूर्व रेल्वेचे प्रवक्ते आदित्य चौधरी यांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग (एनडीआरएफ), ओदिशा आपत्ती व्यवस्थापन कृती दल (ओडीआरएएफ) आणि अग्निशमन दलाचे जवान जमिनीत रुतलेल्या डब्याचे भाग कापून जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न रात्रीपर्यंत सुरू होते.

अपघातस्थळी सुमारे २०० रुग्णवाहिका, ५० बस आणि ४५ फिरते वैद्यकीय पथक कार्यरत आहे. तसेच जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी सुमारे १२०० कर्मचारी कार्यरत होते. हवाई दलाने गंभीर जखमींच्या मदतीसाठी वैद्यकीय पथकांसह बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर पाठवले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपलब्ध नोंदींनुसार हा भारतातील चौथा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे.

प्राथमिक अहवालानुसार..

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी चौकशी अहवालानंतर कारण स्पष्ट होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, प्रस्तुत वृत्तसंस्थेकडे असलेल्या अधिकृत प्राथमिक चौकशी अहवालानुसार कोरोमंडल एक्स्प्रेसला अप मुख्य मार्गिकेसाठी सिग्नल देण्यात आला आणि तो लगेच बंद करण्यात आला. परिणामी, ती लूप लाइनमध्ये घुसली आणि मालगाडीला धडकली. त्याच वेळी बंगळूरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाऊन मुख्य मार्गिकेवरू गेली आणि तिचे दोन डबे रुळावरून घसरून कोरोमंडल एक्स्प्रेसवर आदळले.

अपघात कसा घडला..संभ्रम कायम

शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बंगळूरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस अनुक्रमे १२८ आणि ११६ किमी प्रतितास वेगाने धावत होत्या. बहनगा बाजार स्थानकावरील लूप लाइनवर मालगाडी उभी होती.

कोरोमंडल एक्स्प्रेस आपली मार्गिका सोडून लूप लाइनवर थांबलेल्या मालगाडीला धडकली की आधी ती रुळावरून घसरली आणि नंतर लूप लाइनमध्ये घुसून उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली, हे अद्याप अस्पष्ट आहे.

अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे डाऊन मार्गिकेवर पडल्याने बंगळूरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डबे घसरले, असाही एक अंदाज आहे.

‘कवच’ यंत्रणा अनुपलब्ध : रेल्वे मंडळाच्या दक्षिण-पूर्व मंडळाचे सुरक्षा आयुक्त ए. एम. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गावर ‘कवच’ ही टक्कररोधी इशारा यंत्रणा उपलब्ध नव्हती. बचावकार्य पूर्ण झाले असून आता आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम सुरू केले आहे, असे भारतीय रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले.

दोषींना कठोर शक्षा करू : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओदिशातील अपघातस्थळाला भेट दिली. ‘‘ही एक वेदनादायक दुर्घटना असून ज्यांनी आपले नातलग गमावले त्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे. जखमींवर उपचार करण्याच्या बाबतीत सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. हा एक गंभीर अपघात आहे. त्यामुळे त्यास कारण ठरलेल्या दोषींना कठोर शिक्षा केली जाईल,’’ असे मोदी यांनी सांगितले.

बहनगा स्थानकावर अप मुख्य मार्गिका (चेन्नईकडे जाणारी) तसेच डाऊन मुख्य मार्गिका (हावडय़ाकडे जाणारी) आणि दोन बाजूंना दोन लूप लाइन आहेत. लूप लाइनवर गाडय़ा उभ्या करून वेगवान किंवा महत्त्वाच्या सुपरफास्ट गाडय़ांना मार्ग दिला जातो.

कोरोमंडल एक्स्प्रेस बहनगा स्थानकाजवळ आली तेव्हा (अप) मार्गिकेला समांतर लूप लाइनवर मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य मार्गिकेवरून जाणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही.

रेल्वेच्या किरकोळ रेखाचित्रानुसार, कोरोमंडल एक्स्प्रेस अप मुख्य मार्गिका सोडून अप लूप लाइनवर उभ्या मालगाडीला मागून धडकली. मालगाडीवर कोरोमंडलचे इंजिन चढल्याचे दृश्य दुर्घटनास्थळी होते.