पीटीआय, इटानगर, गुवाहाटी
अरुणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने विविध ठिकाणी आलेले पूर आणि भूस्खलन यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. शुक्रवारी रात्री पूर्व कामेंग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३जवळ भूस्खलन होऊन एक वाहन वाहून गेल्याने दोन कुटुंबांमधील सात जणांचा मृत्यू झाला असो पोलिसांनी सांगितले. राज्यात पुरामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे.

दुसरीकडे, आसाममध्ये भूस्खलनांच्या घटनांमध्ये पाच व्यक्तींचा मृत्यू झाला. शुक्रवारपासून २४ तासांच्या कालावधीत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सहा जिल्ह्यांमध्ये पूर आला असून त्याचा फटका १० हजारांपेक्षा जास्त लोकांना बसला असल्याचे अधिकृत निवेदनामार्फत सांगण्यात आले.