लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेले आणि आपल्या काळातील सर्वाधिक प्रख्यात सैनिकांपैकी एक असलेले जनरल बिपिन रावत यांनी १ जानेवारी २०२० रोजी संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ- सीडीएस) पदाची सूत्रे स्वीकारली. हे पद भूषवणारे पहिलेच अधिकारी झाल्याने ते देशाचे सर्वात मोठे लष्करी अधिकारी ठरले.

सीडीएस या नात्याने जनरल रावत हे नौदल, हवाई दल आणि लष्कर यांचे नेतृत्व करणाऱ्या इतर चार तारांकित अधिकाऱ्यांचे वरिष्ठ होते. पूर्वी संरक्षण खात्याकडे असलेल्या काही जबाबदाऱ्या वेगळ्या करून तयार झालेल्या लष्करी व्यवहार खात्याचे (डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स) देखील ते प्रमुख होते. याशिवाय संरक्षम दलांशी संबंधित सर्व मुद्यांवर ते संरक्षम मंत्र्यांचे प्रधान लष्करी सल्लागार होते.

३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत लष्कराचे २७वे प्रमुख म्हणून रावत हे आनंदी व स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जात. लष्कराचे फेरसंघटन करून त्याला भविष्यातील युद्धासाठी सुयोग्य बनवण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. युद्धविषयक संरचनांसाठी चपळ व स्वयंपूर्ण असलेल्या मोठ्या ब्रिगेडच्या स्वरूपातील एकात्मिक युद्धगटांची (‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रूप्स) निर्मिती ही त्यांच्या पुढाकाराने झालेली आणखी एक सुधारणा होती.

असाधारण धैर्य आणि सेवा

राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री   :  संरक्षण दल प्रमुख जनरल रावत, त्यांची पत्नी व सशस्त्र दलाचे ११ कर्मचारी यांच्या अपघाती मृत्यूमुळे मला अतीव दु:ख झाले आहे. जनरल रावत यांनी असाधारण धैर्य आणि परिश्रम यांसह त्यांनी देशाची सेवा केली. रावत यांच्या अकाली मृत्यूमुळे सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

गौरवशाली कारकीर्द

शरद पवार, माजी संरक्षणमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष : संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच प्रचंड धक्का बसला, तीव्र दु:ख झाले. रावत यांची लष्करातील कारकीर्द तेजस्वी आणि गौरवशाली होती. देशाच्या संरक्षण क्षेत्रात त्यांनी  चार दशके दिलेले योगदान हे नेहमी देशवासीयांच्या स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

अनेक आघाड्यांवर धडाडीने नेतृत्व

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र : संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा, त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे खूप व्यथित झालो आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी  आहे.  भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला मानही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकीर्दही गौरवशाली होती. संरक्षण दलाला तडफदार, सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेले अनुभवी  नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते, त्याचे प्रत्यंतरही अलीकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून येत होते.

गोरखा रायफल्सचा बहाद्दर योद्धा, वडिलांचा सार्थ वारसा

इंडियन मिलिटरी अकॅडमीतून पदवीधर झाल्यानंतर डिसेंबर १९७८ मध्ये रावत यांना ११व्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. या बटालियनचे नेतृत्व पूर्वी त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल लक्ष्मणसिंह रावत यांनी केले होते, जे लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यांचे आजोबाही लष्करात होते. लष्करातील ४१ वर्षांच्या सेवेत रावत यांनी पूर्व सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर इन्फन्ट्री बटालियनचे, राष्ट्रीय रायफल्स सेक्टरचे, काश्मीर खोऱ्यात एका इन्फन्ट्री डिव्हिजनचे आणि ईशान्य भारतात एका कॉप्र्सचे नेतृत्व केले. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी वेस्टर्न कमांडचे नेतृत्व केले व नंतर त्यांची नियुक्ती लष्कराच्या उपप्रमुखपदी करण्यात आली. जनरल रावत यांना उत्तम युद्ध सेवा मंडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध९ सेवा मेडल व सेवा मेडल या पदकांसह अनेक सन्मानांनी गौरवान्वित करण्यात आले होते.