भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देखील पाठवले आहे. शिवाय, आपल्या ट्विटरद्वारे त्यांनी याबाबत माहिती देखील दिली आहे. खासदार संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून एका सुसज्ज आरामाराची स्थापना केली होती. म्हणून आजही महाराजांना भारतीय नौदलाचे सरसंस्थापक किंवा जनक असे म्हटले जाते. स्वराजाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात कान्होजी आंग्रे यांच्या योगदानाला तोड नाही. कान्होजींचा पराक्रम पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब बहाल केला. कान्होजी आंग्रेंनी औरंजेबाच्या स्वारीच्या काळातच नव्हे तर पुढे १७२९ पर्यंत मराठा साम्राज्याची अहर्निश सेवा करून इंग्रज, पोर्तुगिज व सिद्धी या शंत्रूंवर प्रचंड दहशत निर्माण केली. याचे शेकडो पुरावे इंग्रजांच्या व पोर्तुगिजांच्या दफ्तरात मिळतात. ते पाहिल्यानंतर कान्होजी आंग्रे यांच्याएवढा पराक्रमी आरमारी सेनानी अखिल हिंदुस्तानच्या इतिहासात झाला नाही. कोकणच्या नव्हे तर महाराष्ट्राच्य तसेच हिंदुस्थानच्या आरामारी इतिहासाची पूर्तता कान्होजी आंग्रेशिवाय होऊ शकत नाही. महान शिवभक्त आणि स्वराज्याचे आरमार प्रमुख "सरखेल कान्होजी आंग्रेंचे" नाव मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला देण्यात यावे. अशी मागणी मी केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी जी @nitin_gadkari आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @OfficeofUT यांना पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/8PsfeAdUQ9 — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 15, 2020 दिल्ली येथील नॉर्थ ब्लॉकमधील प्रमुखांच्या कार्यालयाच्या अगदी दारात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे स्मारक आहे. कदाचित आजच्या नौदल प्रमुखांनी आपल्या आद्य नौदल प्रमुखाला सॅल्यूट करूनच कार्यालयात प्रवेश करावा, अशी संकल्पना असेल. अशा स्वराज्यनिष्ठ महान वीराची दखल परिवहनमंत्री म्हणून घ्याल आणि मुंबई-गोवा महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नाव द्याल, असा विश्वास आहे. असं खासदार संभाजीराजे यांनी पत्रात म्हटलं आहे.