इम्फाळ : मणिपूरमधील इम्फाळ पूर्व जिल्ह्यांतील दोन गावांत सशस्त्र लोकांनी गोळीबार आणि बॉम्बहल्ले केल्याने पर्वतीय भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ही घटना सनसाबी आणि थमनापोकपी या गावांत घडली.

दरम्यान या घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या भागात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईविरोधात हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षभरापासून मेईती आणि कुकी समुदायातील जातीय हिंसाचारामुळे २५० लोकांची हत्या झाली असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत.

पर्वतीय भागातून सशस्त्र लोकांनी शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास सनसाबी आणि नजीकच्या परिसरात अंदाधुंद गोळीबार केला व बॉम्बहल्लेही केले. यामुळे सुरक्षा दलालाही प्रत्युत्तरादाखल कारवाई करावी लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सशस्त्र लोक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबारामुळे येथील नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. या घटनेनंतर ११ वाजताच्या सुमारास थामनपोकपी गावातही हल्ला झाला. यामुळेही नागरिकांमध्ये दहशत पसरली. दरम्यान सीआरपीएफ कर्मचाऱ्यांनी गोळीबारात अडकलेल्या अनेक महिला, मुले व वृद्धांना सुरक्षित पोहोचविण्यात यश मिळविले.

या घटनेनंतर सुरक्षा दलाने दोन्ही गावांत पथके तैनात केली आहे. घटनेप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> शेतकरी नेते डल्लेवाल यांना वैद्याकीय मदत प्रकरण : पंजाब सरकारला अवमानना नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवाद्यांना अटक

दरम्यान, जातीय हिंसाचाराच्या आगीत धगधगत असलेल्या मणिपूरमधील इफ्फाळ पश्चिम जिल्ह्यातून बंदी घातलेेल्या कांगलेइपक कम्युनिस्ट पक्षाच्या (पीपल्स वॉर ग्रुप) दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली. हे दोन्ही अधिकारी खंडणी वसुलीच्या कारवायात सहभागी होते, असे पोलिसांनी सांगितले. या दोघांनाही जिल्ह्यातील अवांग वानागई लमखई भागातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन मोबाइल फोन आणि अन्य आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली.