नवी दिल्ली : देशभरात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. आसामला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असला तरी येथील ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीखाली आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उडुपीत जनजीवन विस्कळीत

कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. उडुपी पुत्तुर येथे राष्ट्रीय महामार्ग ६६चा काही भागदेखील पाण्यात बुडाला. दक्षिण कन्नड जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवली आहेत.

देशभरात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. आसामला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असला तरी येथील ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीखाली आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> जो बायडेन यांना झालंय काय? चर्चमध्ये पाद्रीने उठण्याची विनंती केल्यानंतरही बायडेन तंद्रीतच बसून राहिले

उत्तराखंडमध्ये तिघांचा मृत्यू

डेहराडून : उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसात तीन जणांचा मृत्यू झाला. डेहराडूनमधील पटेल नगर परिसरातील लाल पूल येथे सोमवारी एक अल्पवयीन मुलगी वाहून गेली होती. तिचा मृतदेह सापडल्याचे प्रशासनातर्फे मंगळवारी सांगण्यात आले. उधमसिंह नगर जिल्ह्यातील हल्दी गावात सोमवारी पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात दोघे जण बुडाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कुमाऊं प्रदेशातील पुराचा फटका बसलेल्या हल्द्वानी, बनबासा, टनकपूर, सितारगंज आणि खातिमा या भागांचा हवाई आढावा घेतला.

ब्रह्मपुत्रा धोक्याच्या पातळीखाली

गुवाहाटी : आसाममधील ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या बहुतेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या खाली वाहत आहेत. राज्यातील पूरपरिस्थितीत किरकोळ सुधारणा झाली असून २७ जिल्ह्यांतील पुरात अडकलेल्या नागरिकांची संख्या सुमारे १८.८० लाख इतकी असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी दिली. 

राजस्थानात सर्वदूर पाऊस

जयपूर : राजस्थानात सर्वदूर पाऊस पडत असून जयपूर आणि सवाई माधोपूर येथे २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडला, तर अन्य काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. राज्यातील सर्वाधिक पाऊस जयपूर जिल्ह्यातील कालवाड येथे ९३ मिमी इतका नोंदवला गेला.

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून ११ जुलैपर्यंत तिथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासनाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीत वाहतुकीचा खोळंबा

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक कळीच्या ठिकाणी पाणी साचून वाहतुकीचा बोजवारा उडाला. दिल्ली पोलीस एक्सवरून ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याची माहिती देऊन दिल्लीकरांना वाहतुकीचे नियोजन करण्याचा सल्ला देत होते.कोंडीनेही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.