भारताच्या कठोर भूमिकेनंतर बुधवारी (२२ मार्च) लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी येथे खलिस्तान समर्थक मोर्चेकऱ्यांना बॅरिगेट्सच्या मागे रोखलं, जेणेकरून रविवारसारखी घटना पुन्हा घडू नये. दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेट्स हटवल्यानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मध्य लंडनस्थित भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर आता ब्रिटनचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ही इमारत इंडिया हाऊस या नावाने ओळखली जाते. या इमारतीबाहेर पोलीस अधिकारी आणि गस्त पथक नेमण्यात आलं आहे. उच्चायुक्तालयाबाहेरील खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना रविवारी घडली होती. भारतीय राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या घटनेचा निषेध नोंदवला गेला. तसेच मोदी सरकारने याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

उच्चायुक्तालयाबाहेर राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्यानंतर भारताने याप्रकरणी कारवाईची आणि उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. परंतु ब्रिटिश सरकारने याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर भारताने ब्रिटिशांना जशास तसं उत्तर दिलं. केंद्र सरकारने ब्रिटीश दूतावासाबाहेरील सुरक्षेत कपात केली होती. त्यानंतर आता ब्रिटन वठणीवर आला आहे.

हे ही वाचा >> “आता तरी माझं ऐकाल का?” छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, “त्यांनी मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान

दोन दिवसांपूर्वी पंजाबमधील खलिस्तानवादी स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंह याच्याविरोधात सुरु असेलल्या कारवाईचा निषेध म्हणून खलिस्तानी समर्थकांनी ब्रिटनमधील भारतीय दुतावासासमोर आंदोलन केलं होतं. तसेच यावेळी खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर असलेल्या तिरंग्याचा अपमान केला होता. त्यानंतर भारत सरकारने ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांना बोलावून घेतलं आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. मात्र, यासंदर्भातील दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.