एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ च्या अंतिम फेरीत (१९ नोव्हेंबर) भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारताच्या या दारूण पराभवाने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. भारतच विश्वविजेता होईल, असं जगभरातल्या क्रिकेटरसिकांना वाटत होतं. परंतु, ऑस्ट्रेलियाने बलाढ्य भारतीय संघाला पराभूत केलं. दरम्यान, या सामन्याचं अहमदाबादमध्ये आयोजन केल्यामुळे बीसीसीआयवर टीका होत आहे. तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पनवती म्हणत टोला लगावला आहे. दरम्यान, आता भाजपाने या पराभवाचं खापर गांधी घराण्यावर फोडलं आहे.

भारताच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाबाबत आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिंमत बिस्व सर्मा यांनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं आहे. तेलंगणातील निवडणूक प्रचारसभेत बोलताना सरमा यांनी इंदिरा गांधींच्या जयंतीचा आणि भारताच्या पराभवाचा संबंध जोडून वक्तव्य केलं आहे. सरमा म्हणाले, इंदिरा गांधींच्या जयंतीच्या दिवशी अंतिम सामना खेळवण्यात आला आणि भारताचा पराभव झाला. म्हणूनच मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला विनंती करतो की, पुढच्या वेळी असा अंतिम सामना असेल तेव्हा काळजी घ्या की तो दिवस गांधी घराण्याशी संबंधित नसावा.

हिंमता बिस्व सरमा म्हणाले, काही दिवसांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. मी नंतर पाहिलं की तो दिवस कोणता होता आणि आपण का हरलो? मी पाहिलं की, ज्या दिवशी अंतिम सामना खेळवला त्या दिवशी इंदिरा गांधी यांची जयंती होती. इंदिरा गाधींच्या जयंतीच्या दिवशी विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात आला, त्यामुळेच आपण पराभूत झालो. त्यामुळे मी बीसीसीआयला विनंती करतो की, पुढच्या वेळी जेव्हा असा अंतिम सामना असेल तेव्हा थोडं तपासून पाहा की तो दिवस गांधी घराण्याशी संबंधित नसावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वचषक स्पर्धेतला अंतिम सामना पाहण्यासाठी बॉलिवूड कलाकार, दिग्गज नेते नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हा सामना पाहण्यासाठी हजर होते. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “आपली मुलं चांगलं खेळत होती, ते वर्ल्ड कप जिंकले असते. पण तिथं पनवतीमुळे आपण हरलो”, यावेळी राहुल गांधींनी थेट कोणाचंही नाव घेतलं नाही. परंतु, त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. राहुल गांधी म्हणाले, टीव्हीवाले हे नाही सांगणार की कोण पनवती, पण जनतेला माहिती आहे.