Honeymoon Murder : इंदूरचा व्यावसायिक राजा रघुवंशी याची त्याच्या पत्नीने प्रियकर आणि सुपारी किलर्सच्या मदतीने हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. राजा आणि सोनम यांचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. त्यानंतर ते २० मे रोजी मधुचंद्रासाठी इंदूरहून बंगळुरुला गेले. त्यानंतर गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. यानंतर २३ मे रोजी राजा रघुवंशीची ‘दाओ’ या तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. त्यासाठी सोनमनेच हल्लेखोरांना इशारा केला होता. आता लग्नाआधी सोनमने संजय वर्मा नावाच्या माणसाला १०० हून अधिक फोन केले होते. हा संजय वर्मा कोण? याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
२० मे रोजी सोनम आणि राजा मधुचंद्रासाठी इंदूरहून रवाना झाले. बंगळुरुमध्ये फिरल्यानंतर सोनमने राजासमोर अट ठेवली की शरीर संबंध ठेवण्यापूर्वी आपल्याला कामाख्या देवीचं दर्शन घ्यावं लागेल. राजाने ती अट मान्य केली. ज्यानंतर दोघंही २२ मे रोजी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले. तिथे त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. राजाने त्या ठिकाणी फोटोही काढले. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी हे दोघंही शिलाँग येथील इस्ट खासी हिल्स या ठिकाणी पोहचले. तिथे चेक होम स्टे मध्ये चेक इन केलं आणि ट्रेक करायला सुरुवात केली. यावेळी सोनमच्या सासूचा म्हणजेचा राजाच्या आईचा फोनही तिला आला होता. राजाला शिलाँगला घेऊन जायचं आणि तिथेच ठार करायचं हे सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा याच्यासह ठरवलं होतं. त्यानुसार तीन सुपारी किलर्स या ठिकाणी पोहचले होते. त्यांनी विशाल, आकाश, आणि आनंद या तिघांनी मिळून राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकला. सुरुवातीला सोनम आणि राजा रघुवंशी दोघंही बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. या दोघांच्या घरातले काही सदस्यही शिलाँगला पोहचले. पण सोनम आणि राजा कुणाचाच पत्ता लागला नाही. पोलीस, एसडीआरएफ आणि स्थानिक गिर्यारोहण पथकाकडून या दोघांचा शोध सुरु होता. २ जून रोजी राजाचा मृतदेह २०० फूट खोल दरीत आढळून आला. त्यानंतरही सोनम बेपत्ता होती. राजाच्या शरीरावर वार होते त्यामुळे त्याची हत्या केली गेली आहे हे पोलिसांना वाटलं होतं पोलिसांचा तो अंदाज बरोबर ठरला.
सोनम कशी पकडली गेली?
पोलिसांनी सोनमचा मोबाइल रेकॉर्ड तपासला तेव्हा तिचे फोन कॉल राज कुशवाहा याला गेल्याचं समजलं. पोलिसांनी जेव्हा राज कुशवाहाला अटक केली त्यानंतर सोनम ८ जूनच्या रात्री शरण आली. सोनमने गुन्ह्याची कबुली दिली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी सोनम, राज कुशवाहा आणि तीन सुपारी किलर्सना अटक केली आहे. दरम्यान संजय वर्मा हे नाव समोर आलं होतं त्याला सोनमने १०० हून अधिक फोन कॉल केल्याचीही माहिती समोर आली होती तो संजय वर्मा कोण हे आता पोलिसांनी सांगितलं आहे.
कोण आहे संजय वर्मा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय वर्मा हा दुसरा तिसरा कुणी नाही तर सोनमचा कथित बॉयफ्रेंड राज कुशवाहाच आहे. त्याने या नावाने सीमकार्ड खरेदी केलं होतं. सोनमने या क्रमांकावर लग्नाच्या आधी १०० हून अधिकवेळा फोन केला होता. तसंच लग्नानंतरही ती या क्रमांकाच्या संपर्कात होती हा क्रमांक राज कुशवाहा याच्याकडेच होता त्याने नाव बदलून सीम खरेदी केलं होतं. आम्ही संजय वर्माचं नाव समोर आल्यावर शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोन स्विच ऑफ होता. त्यानंतर आमच्या तपासात हे कळलं की संजय वर्मा दुसरं तिसरं कुणी नाही तर राज कुशवाहाच आहे. राज कुशवाहा आणि सोनमने मिळूनच राजाच्या हत्येचा कट रचला होता असंही पोलीस अधिकारी विवेक सैय्याम यांनी सांगितलं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
हत्येमागे आर्थिक कारण आहे का? याचाही तपास सुरु
पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून राजा रघुवंशीच्या हत्येमागे आर्थिक कारण आहे का? याचाही तपास केला जातो आहे. सोनम आणि राज कुशवाहा यांचे प्रेमसंबंध होते. पण राज कुशवाहा सोनमच्या कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या कंपनीतच काम करत होता. राज आणि सोनमने मिळून राजाची हत्या केली. त्यासाठीचा कटही व्यवस्थित रचला होता. गुवाहाटी, नौगैरट आणि वेईसडाँग हिल्स या तीन ठिकाणीही राजाला मारण्याचा प्रयत्न मारेकरी करत होते. राजाची हत्या केल्यानंतर सोनम शिलाँगहून बसने गुवाहाटीला आली. त्यानंतर पश्चिम बंगाल, बिहारहून उत्तर प्रदेशात पोहचली. अशीही माहिती पोलिसांनी दिली.