पंतप्रधानपदाच्या शर्यतीतला ‘डार्क हॉर्स’ मी नाही, तसंच पंतप्रधान होण्याची माझी कोणतीही इच्छा, स्वप्न किंवा अजेंडा नाही असं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भाजपाला बहुमत मिळणार नाही आणि या परिस्थितीत त्यांना मित्रपक्षांवर निर्भर राहावं लागणार आहे. त्यामुळे पंतप्रधान पदासाठी दुसरा चेहरा निवडाला लागेल आणि नितीन गडकरी यासाठी सर्वात जास्त योग्य उमेदवार असतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. यामुळे नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जात होतं. पण नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदीच आमचे नेते असून, तेच पंतप्रधान असतील असं सांगितलं आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी भाजपाप्रणीत एनडीए बहुमताने जिंकणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करणार आहे असा विश्वास व्यक्त केला. ‘आम्ही भाजपा सरकार नाही तर एनडीए सरकार स्थापन करु. जरी आम्ही आमच्या बळावर बहुमत मिळवलं तरी आम्ही एनडीए सरकार म्हणून ग्राह्य धरु आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढे जाऊ’, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
भाजपाला जास्त जागा मिळण्यामागे गणित काय असं विचारलं असता नितीन गडकरी यांनी सांगितलं की, ‘ओदिशा, बंगाल आणि केरळमध्ये आम्ही जास्त जागा जिंकू. उत्तर प्रदेशातही तुम्ही विचार करत आहात तसा निकाल लागणार नाही’.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमकपणे प्रचार करत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना टार्गेट करत असल्याचं विचारलं असता नितीन गडकरी यांनी सांगितलं की, ‘काँग्रेसने ५६ वेळा पंतप्रधान चोर आहे म्हटलं आहे. निवडणुकीच्या काळात क्रिया आणि प्रतिक्रिया सुरुच असतं’. ‘राहुल गांधी यांनी अजून परिपक्व, गंभीर आणि ज्ञानी होणं गरजेचं आहे’, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
आर्थिक प्रगती झाली नसल्याची टीका वारंवार होत असल्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी सांगितलं की, ‘या गेल्या पाच वर्षातील समस्या नसून ७० वर्षांपासून आहेत. पाच वर्ष फार कमी आहेत. रोजगार समस्या आहे, पण ती आजची नाही. गेल्या पाच वर्षात आम्ही जे यश मिळवलं आहे त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल’.
‘नोकऱ्या आणि शेतीसंबंधी समस्या आहेत. पण हे सगळं काँग्रेसची चुकीची आर्थिक धोरणं, भ्रष्टाचारी सरकारं आणि योग्य दृष्टीकोन नसल्याने या समस्या निर्माण झाल्या आहेत. परिस्थिती सुधारण्यासाठी पाच वर्षही कमी आहेत. आम्ही सर्व धोरणं बदलली आहेत, पण त्यासाठी वेळ लागेल’, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.