जर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया नार्को, पॉलिग्राफ चाचणीला तयार असतील तर मी कुठल्याही चाचणीला सामोरा जायला तयार आहे असं चॅलेंज अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी दिलं होतं. ते या दोघांनी स्वीकारलं आहे. तसंच इतर महिला पैलवानांप्रमाणे मी देखील अनेक वर्ष मूग गिळून गप्प बसले होते, त्याचं कारण फक्त बृजभूषण शरण सिंह होता असं म्हणत विनेश फोगाटने तिची आपबिती सांगितली आहे.

जंतरमंतरवरच्या मल्लांनी काय म्हटलं आहे?

आम्ही न्याय मिळावा म्हणून मागच्या महिन्याभरापेक्षा अधिक काळ झगडतो आहोत. संघर्ष करत आहोत. त्याआधीही आम्ही आंदोलन केलं. आम्हाला फूटपाथवर झोपावं लागतं आहे, डास चावत आहेत, भटक्या कुत्रे आमच्या सोबतीला आहेतच. रात्रीच्या वेळी स्वच्छ स्वच्छतागृहंही आम्हाला मिळत नाहीत. आमची लढाई न्याय मिळण्यासाठी आहे. आम्हाला या सगळ्या विषयावर कायमस्वरुपी तोडगा हवा आहे. हे म्हणणं आहे जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या सात महिला पैलवानांचं त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. या सगळ्यांनीच बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

आम्ही जेव्हा जानेवारी महिन्यात आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं ठरवलं, तसंच कुस्ती फेडरेशनमध्ये असलेल्या चुकीच्या मॅनेजमेंटविषयी आवाज उठवला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की आमच्या आवाज उठवण्याकडे लक्ष दिलं जाईल. गेल्या काही महिन्यात ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे आमचा यावर विश्वासही बसला की आमच्या मागण्या मान्य होतील. क्रीडा मंत्रालयाकडून एक समितीही स्थापन झाली आहे जी या आरोपांची चौकशी करते आहे.

विनेश फोगाटने काय म्हटलं आहे?

जानेवारी महिन्यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि मी आम्ही ठरवलं की जंतरमंतरवर आंदोलन करायचं. आम्हाला तेव्हा वाटलं होतं की हे आंदोलन आम्हाला दोन-ते तीन दिवसांपेक्षा जास्त काळ करावं लागणार नाही. महिला मल्लांना मान-सन्मान मिळावा आणि त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली जावी म्हणून आम्ही हे आंदोलन सुरु केलं. आम्हाला न्याय मिळण्यासाठी आता नेमकी किती वाट बघावी लागणार आहे? आमच्यासोबत जे घडलं ते आम्हाला विचारलं जातं. मी या मुलींना सांगतो की तुम्ही बोला. पण याच बाबत सारखं सारखं आम्ही बोललो आहे. सुरुवातीला आम्ही समितीला सगळं सांगितलं, इंडियन ऑलिम्पिक कमिटीला सगळं सांगितलं, त्यानंतर पोलिसांनी मॅजिस्ट्रेटसमोर आमचे जबाब नोंदवले. सध्या एक महिन्याहून अधिक काळ झाला आम्ही न्यायाची वाटच बघतो आहोत. एशियन गेम्स असोत किंवा इतर स्पर्धा आम्ही भारताचं प्रतिनिधीत्व केलं. भारतासाठी पदकं जिंकली. मात्र ही लढाई मोठी आहे. जर न्याय मिळू शकत नसेल तर या गळ्यात अडकवलेल्या पदकांचा काय उपयोग? असंही विनेश फोगाटने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर सगळ्या महिला मल्लांप्रमाणे इतकी वर्षे मी देखील गप्पच बसले होते असाही उल्लेख विनेश फोगाटने केला आहे. मी याच माणसामुळे (बृजभूषण सिंह) गप्प होते. बृजभूषण सिंह यांना का वाचवलं जातं आहे? मात्र आज मी हेदेखील सांगते आहे की जोपर्यंत बृजभूषण सिंहना अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही जंतरमंतर सोडणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून आमचा हा लढा सुरु आहे. प्रचंड तणावात आणि अश्रूंमध्ये आम्ही हा लढा देतो आहोत. मला ठाऊक आहे की ही प्रदीर्घ लढाई आहे. मात्र महिला मल्लांना न्याय मिळावा यासाठी मी कुठलाही त्याग करायला तयार आहे असंही विनेश फोगाटने सांगितलं. दुसरीकडे बृजभूषण शरण सिंह यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न इंडियन एक्स्प्रेसने केला. मात्र प्रतिक्रेयासाठी ते उपलब्ध नव्हते. त्यांनी हेच म्हटलं आहे की मी काहीही चुकीचं वागलेलो नाही.