विश्वचषक स्पर्धेला ३० मे पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी ५ जूनला होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा प्रवाळ दावेदार मानला जात असल्याचे अनेक क्रिकेट जाणकारांचे मत आहे. याच मताला दुजोरा देणारे मत सिक्सर किंग युवराज सिंग याने मांडले आहे. भारतीय संघासह इंग्लंडचा संघही विजेतेपदाचा दावेदार आहे असे मला वाटते.  त्यांनादेखील विजेतेपदाची चांगली संधी आहे, असे मत युवीने व्यक्त केले आहे.

२०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात युवराजची महत्वाची भूमिका होती. त्या स्पर्धेत युवराजला मालिकावीराचा ‘किताब देण्यात आला होता. त्या विश्वचषक स्पर्धेपेक्षा ही विश्वचषक स्पर्धा कशी वेगळी आहे असा प्रश्न युवराजला विचारण्यात आला. त्यावर बोलताना तो म्हणाला, “२०११ मध्ये खेळण्यात आलेली स्पर्धा आणि आताची स्पर्धा यात खूप फरक आहे. आता ३० यार्डच्या वर्तुळात ५ फिल्डर ठेवावे लागतात. त्यावेळी ४ फिल्डर ठेवले तरी चालत असे. त्यामुळे २६० ते २८० ही देखील आव्हानात्मक धावसंख्या असायची. आता मात्र ३०० हून अधिक धावसंख्या उभारली तरच आव्हानाचा बचाव करणे सोयीचे ठरते. हे सारं त्या एका फिल्डरमुळे घडतं. पण माझ्या मते भारताच्या संघाकडे चांगले खेळाडू आहेत, जे मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करू शकतील.”

“गेल्या २-३ वर्षात भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. भारत किंवा इंग्लंड या दोन संघांना चांगल्या अंतिम संघात पोहोचण्याची चांगली संधी आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या पुनरागमनानंतर त्यांनादेखील चांगली संधी आहे. त्यांच्याकडे उत्तम गोलंदाजांचा ताफा आहे. त्यामुळे टॉप ४ मध्ये हे ३ संघ असतील”, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

“भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली या दोघांपैकी किमान एकाने तरी चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. पण टीम इंडियाचा एक्स-फॅक्टर आहे हार्दिक पांड्या. त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी दोनही गोष्टी भारताच्या फायद्याच्या आहेत. कारण तो चांगल्या लयीत आहे. मात्र २० षटकांचा खेळ आणि ५० षटकांचा खेळ यातला फरक त्याने लक्षात घ्यायला हवा”, असेही युवराजने नमूद केले.