India Pakistan Tension : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. त्या कारवाईनंतर पाकिस्तानची चलबिचल वाढली आणि पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर ड्रोन हल्ले करण्यात येत होते. तसेच भारताकडूनही या ड्रोन हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अखेर आज (१० मे) संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाबाबत एकमत झालं. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमआय यांच्याशी आज दुपारी ३.३५ वाजता फोनवरून चर्चा केली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील गोळीबार, जमिनी लष्करी कारवाई तसेच हवाई आणि समुद्री कारवाई भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकमत झालं आणि त्यानंतर शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, शस्त्रविरामानंतर काही तासांतच पाकिस्तानची आगळीक पुन्हा समोर आली. भारताच्या सीमेवर काही ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली होती. शस्त्रविरामानंतर पाकिस्तानची आगळीक समोर आल्यानंतर भारताने पाकिस्तानला आता सूचक इशारा दिला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानच्या कुरापतीबाबत रात्री ११ वाजता पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे. पाकिस्तानने परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, असं म्हणत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे.
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "An understanding was reached this evening between the DGMOs of India and Pakistan to stop the military action that was going on for the last few days. For the last few hours, this understanding is being violated by Pakistan.… pic.twitter.com/BNGnyvTnUH
— ANI (@ANI) May 10, 2025
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काय म्हटलं?
पाकिस्तानने आज झालेल्या शस्त्रविरामाच्या कराराचं उल्लंघन केलं आहे. मात्र, भारतीय सशस्त्र दल योग्य प्रत्युत्तर देत असल्याचं विक्रम मिस्री यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “भारतीय सशस्त्र दल परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर सीमा उल्लंघनाच्या पुनरावृत्तीच्या कोणत्याही घटनांना कठोरपणे सामोरे जाण्याच्या सूचना भारतीय सशस्त्र दलांना देण्यात आल्या आहेत.”
#WATCH | Delhi: Foreign Secretary Vikram Misri says, "The Armed Forces are maintaining a strong vigil on the situation and have been given instructions to deal strongly with any instances of repetition of the violations of the borders along the international border as well as the… pic.twitter.com/35qhh0AFWU
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— ANI (@ANI) May 10, 2025
“गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये एक समझोता झाला. मात्र, त्यानंतर गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या सामंजस्याचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय सैन्य या घुसखोरीला प्रत्युत्तर देत आहे आणि त्याचा सामना करत आहे. पाकिस्ताननं स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं. शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं हे निंदनीय आहे. मात्र, असं झाल्यासं सैन्याला चोख उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आम्हाला वाटतं की पाकिस्तानने ही परिस्थिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी त्वरित योग्य कारवाई करावी”, असा इशारा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिला आहे.