India-Pakistan Tensions: भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी संध्याकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँका आणि वित्तीय संस्थांच्या सायबर सुरक्षा तयारीबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीला विविध सार्वजनिक आणि खाजगी बँकांचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एनएसई, बीएसई आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम यांच्यासह इतर अनेक बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम सायबर सुरक्षा तयारीची खात्री करण्यासाठी विविध महत्त्वाच्या क्षेत्रातील संस्थांशी समन्वय साधत आहे.
गुरुवारी रात्री पाकिस्तानी सशस्त्र दलांनी भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रे वापरून हल्ले करत जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने त्याचे हल्ले निष्प्रभ ठरवले. याचबरोबर पाकिस्तानी हवाई दलाचे एक विमान आणि ५० हून अधिक ड्रोन पाडले आहेत.
पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत एल-७० तोफा, झेयू-२३एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणत वापर करण्यात आला. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
७ मे रोजी, द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले होते की ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची जबाबदारी असलेल्या संस्था, जसे की ऊर्जा मंत्रालय, बँकांसह वित्तीय संस्था आणि टेलिकॉम ऑपरेटर्सना पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक सायबर हल्ल्यांना तोंड द्यावे लागल्याने “हाय अलर्ट” वर राहण्यास सांगण्यात आले आहे.
“काही पायाभूत सुविधांवर DDoS सायबर हल्ले झाले आहेत, परंतु आम्ही ते रोखले. आता आम्ही आणखी सतर्क झालो आहोत, कारण अशा प्रकारचे आणखी सायबर हल्ले करण्याचे प्रयत्न नक्कीच केले जातील,” असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने आधी सांगितले होते.